मनसेच्या 9 फेब्रुवारीच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली…मनसे होणार आक्रमक?
मुंबई | महाईन्यूज |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 23 जानेवारीला त्यांच्या राज्यव्यापी अधिवेशनात 9 फेब्रुवारीला होणाऱ्या मोर्चाची घोषणा केली होती. हा मोर्चा घुसखोरांच्या विरोधातील मुद्द्यावरुन असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यावेळी या मोर्चाचा मार्ग गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान ठरवण्यात आला होता…
मात्र मुंबई पोलिसांनी या मार्गाने मोर्चा काढण्यास मनाई करत मार्गात बदल करुन दिला . बदलेल्या मार्गानुसार मरिन लाईन्स ते आझाद मैदान असा मोर्चा होता. परंतु मुंबई पोलिसांनी आता मोर्चालाच पूर्णपणे परवानगी नाकारली आहे. दक्षिण मुंबईतील भागात मोर्चे काढण्यास मनाई असून तो संवेदनशील आणि गजबजलेला भाग असल्याने तेथे मोर्चा काढू शकत नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.
मुंबई पोलिसांनी फक्त आझाद मैदानात सभा घेण्याचे निर्देशन राज ठाकरे यांना दिले आहे. मात्र मुंबई पोलिसांच्या या निर्णयामुळे मनसे आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर मोर्चापूर्वीच पोलिसांनी मनसैनिकांना नोटिसा सुद्धा पाठवल्या आहेत.