पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपा कारभार म्हणजे ‘नळावरील भांडणे’
![Criticism of NCP youth leader Sandeep Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/WhatsApp-Image-2020-12-09-at-18.09.46-1.jpeg)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते संदीप पवार यांची टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाची शहराल गरज
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेमध्ये भाजपामधील दोन गटांमध्ये बुधवारी राडा झाला. हा वाद विकासकामांवरुन नव्हे, तर ‘मलई’च्या कमाईवरुन होता. सत्ताधारी भाजपा नेत्यांना शहराच्या विकासाशी देणे-घेणे नाही. महापालिकेचा कारभार म्हणजे ‘नळावरील भांडणे’ असा झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते संदीप पवार यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड शहराला आता पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्तवाची गरज आहे. भाजपाच्या वादात गेल्या चार वर्षांमध्ये शहराचे नुकसान झाले, अशी खंतही संदीप पवार यांनी व्यक्त केली आहे.
स्थायी समिती सभेत बुधवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर आणि सभापती संतोष लोंढे यांच्या कारभारावर आक्षेप नोंदवून भाजपामधील आमदार लक्ष्मण जगताप समर्थक सदस्यांनी राडा केला. सभागृहातील माईक तोडण्यात आला. सभागृहात तोडफोड केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, काही सदस्यांनी नगरसचिवांना धक्काबुक्की केली आहे.
भाजपा सत्ताकाळात महापालिका अधिकाऱ्यांमध्ये दहशत आहे. शहराचे दोन भाग करुन भाजपा नेत्यांनी आपआपले ‘संस्थान’ निर्माण केले आहे. भाजपाची आरेरावी आणि हेकेखोरपणाचा फटका विकासकामांना बसत आहे. भ्रष्टाचार आणि अनियमित कारभारामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे.
महापालिकेचे अधिकारी भाजपाचे घरगडी आहेत का?
स्थायी समिती सभागृहात झालेल्या गोंधळामध्ये भाजपाच्या सदस्यांनी सभागृहात तोडफोड केल्याचे वृत्त आहे. माईक तोडणे, ग्लास फोडणे ही संस्कृती चुकीची आहे. याहून पुढे काही सदस्यांनी महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकारही घडल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका भवनात हाणामारी होते, अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली जाते, धक्काबुक्की केली जाते. त्यामुळे महापालिका अधिकारी म्हणजे भाजपाचे घरगडी आहेत काय? असा सवालही संदीप पवार यांनी उपस्थित केला आहे.
पुन्हा अजित पवारांच्या नेतृत्वाची शहराला पुन्हा गरज…
‘भय ना भ्रष्टाचार’ अशी जाहिरातबाजी करुन २०१७ मध्ये भाजपाने महापालिकेत सत्ता मिळवली. मात्र, गेल्या चार वर्षांच्या काळात भाजपाने महापालिक भय आणि भ्रष्टाचार दोन्ही करुन दाखवले आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘बेस्ट सिटी’ बनवले. शहराच्या विकासात अजित पवार यांनी दुजाभाव केला नाही. मात्र, भाजपाने शहराचे दोन भाग केले. अनागोंदी कारभार करुन पिंपरी-चिंचवडकरांना वेठीस धरले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाची गरज आहे, अशी अपेक्षा संदीप पवार यांनी व्यक्त केली आहे.