जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री हवाच कशाला – नारायण राणे
मुंबई | राज्यभरात कोरोनाने कहर केला आहे. दरम्यान राज्यातील राजकारणही तापलेले दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका होताना दिसत आहे. तसेच या सरकारमध्ये सन्मवयाचा अभाव असल्याचेही वारंवार बोलले जात आहे. आता भाजपच्या नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्याची अवस्था दयनीय आहे. मात्र मुख्यमंत्री हे गेले काही महिने मंत्रालयातच गेलेले नाहीत. ते तर मातोश्रीच्या पिंजऱ्यात असल्याची खोचक टीका नारायण राणेंनी केली आहे.
तसेच नारायण राणेंनी ठाकरे सरकारमध्ये सन्मवयाचा अभाव असल्याची टीकाही केली. ते म्हणाले की, महाविकास आघाडीतील तिन्ही सरकारमध्ये मतभेद आहेत. शिवसेना तर कोणाला विचारतच नाही. तसेच महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू, त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही, त्यासाठीच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती असेही राणे म्हणाले. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये एकच मुख्यमंत्री नाहीत. तीन ते चार मुख्यमंत्री आहेत. असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना नारायण राणे म्हणाले की, राज्याची अवस्था दयनीय आहे. मात्र मुख्यमंत्री गेले काही महिने मंत्रालयात गेलेलेच नाहीत. जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे. मुख्यमंत्री ‘मातोश्री’च्या पिंजऱ्यात आहेत. ते मंत्रालयात येत नसतील तर मंत्रालयाचं नाव पुन्हा सचिवालय करा अशी टीकाही त्यांनी केली. तसेच ठाकरे सरकारकडून मला कुठलीही अपेक्षा नाही. हे सरकार गेलं तरच महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचतील असं राणे म्हणाले.