गेल्या १०-१२ वर्षांत जन्माला आलेले आता आम्हाला अक्कल शिकवतायत !
मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. “गेल्या १०-१२ वर्षात जन्माला आलेले नेते आता राजकारणात चमकायला लागले आहेत. आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत”, असे म्हणत एकनाथ खडसेंनी पक्षातील काही नेत्यांना बोचरा टोला लगावला आहे.
“मी ४० वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून माझ्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. राज्याच्या जनतेत आणि मला मानणाऱ्या लोकांमध्ये याबद्दल एक प्रकारची चीड आहे. त्याचा कधी स्फोट होईल हे सांगता येणार नाही”, असा इशारा देखील यावेळी एकनाथ खडसेंनी दिला आहे. एकनाथ खडसे हे कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी वारंवार आपला पक्ष आणि पक्षातील नेत्यांप्रति उघड नाराजी व्यक्त केली आहे.
एकनाथ खडसे आपल्या वाढदिवसानिमित्त बोलत होते. यावेळी, त्यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांवर निशाणा साधण्याची संधी सोडलेली नाही.“निव्वळ मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन ही गोष्ट जनतेला आवडली नाही का ? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत आहे. प्रचंड मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात स्वबळावर भाजपचे एकट्याचे रकार आणले.
तेव्हा आता आहेत त्यांपैकी अनेक जण नव्हते. हे गेल्या १०-१२ वर्षात जन्माला आलेले लोक आता राजकारणात चमकायला लागले आहेत. हे आता आम्हाला अक्कल शिकवत आहेत. गेली ४० वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून माझ्यावर अन्याय झाल्याची भावना आहे”, असे खडसे यावेळी म्हणाले.