कल्याण, डोंबिवलीत ऑक्सिजनचा तुटवडा
कल्याण, डोंबिवली शहरांतील रुग्णालयांत गेल्या दोन दिवसांपासून कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे काही रुग्णालये रुग्ण दाखल करून घेण्यास नकार देत आहेत. रुग्णाच्या जीवाशी खेळ होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचे या रुग्णालयांचे म्हणणे आहे. महापालिका आयुक्तांनी ही समस्या तातडीने सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
गुरूवार सकाळपासून कल्याण, डोंबिवलीमधील दोन मोठ्या रुग्णालयांतील ऑक्सिजन संपले. या रुग्णालयांकडून ऑक्सिजनची ऑर्डर नोंदवली मात्र पुरवठादाराकडून साठा नसल्याचे उत्तर देण्यात आले. त्यामुळे संबधित रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला. काही जणांनी समाज माध्यमांवरून या समस्येला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. त्याची माहिती मिळताच आरोग्य विभागाने संबंधित कंपनी आणि पुरवठादाराशी संपर्क साधला. त्यांना आवश्यक ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्याचे आदेश दिले. परंतु सिलिंडरच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. पुरवठादाराच्या म्हणण्यानुसार, महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडून ऑक्सिजन सिलिंडरची ऑर्डर दोन दिवसांपूर्वी देण्यात आली आहे. मात्र रबाळे येथील कंपनीतून सिलिंडर मिळालेले नाही.
शहरातील ऑक्सिजन कमतरतेबाबत जिल्हा आरोग्य विभागाला कळवण्यात आले आहे. आरोग्य संचालकांनी सरकारी रुग्णालयांना आवश्यक असलेले ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र खासगी रुग्णालयांतील रुग्णांचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. रुग्णालये दोन ते चार दिवसांचा साठा ठेवतात, मात्र दोन दिवसांच्या तुटवड्यानंतरही तीच परिस्थिती राहिल्यास कठीण परिस्थिती उद्भवू शकते. रुग्णालयातील ऑक्सिजनच्या नियंत्रणाची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनाकडे देण्यात आली असून या अधिकाऱ्यांनी मात्र अशी कोणतीही समस्या नसल्याचे सांगितले.