औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकला : इम्तियाज जलील
औरंगाबाद – कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिका निवडणूक रद्द करावी, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोनाने भारतातही दहशत निर्माण केली आहे. देशासह राज्यात कोरोनामुळे अनेक नेत्यांनी आपले महत्त्वाचे दौरे रद्द केले आहेत.
राज्य आणि केंद्र सरकारने सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला दिला आहे. याचा आधार घेत इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. निवडणका होईपर्यंत पालिकेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करावी, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, महापालिका निवडणुकीसाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने वॉर्ड रचना केली आहे. १५ ते २० मार्चच्या दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता लागू होते.
निवडणुकीची आचारसंहिता ४५ दिवसांऐवजी ३० दिवसांचीच राहणार असल्याने १५ ते २० एप्रिल दरम्यान मतदान होईल, असे मानले जात आहे. ३१ जानेवारी २०२० पर्यंत मतदार नोंदणी केलेल्यांना महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळणार आहे.