उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा सल्ला, म्हणाले…! (पहा व्हीडिओ)
!["If you don't stop calling me Champa, then मला," Chandrakant Patil warns Deputy Chief Minister Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/ajit_pawar_chandrakant_patil.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकारी आणि प्रशासन कसे चालवावे? याबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सल्ला दिला आहे.
अजित पवारांनी मुंबई, पुणे आणि बारातमी येथील कामाचे नियोजन कसे करावे? याचे वेळापत्रकही दिले आहे. वास्तविक, महाराष्ट्राचे चारवेळा उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार चंद्रकांत पाटलांनी दिलेला सल्ला कितपत मनावर घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने राज्य पातळीवर सेवा सप्ताह आयोजित करीत आहे. पिंपरी-चिंचवडमधील भाजपाच्या वतीने शनिवारी या सप्ताहाची सुरूवात झाली. दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप करून उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील वक्तव्यावर भाष्य केले.
पुण्यातील एका बैठकीदरम्यान अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना आपल्या स्टाईलने सज्जड दम भरला होता. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात किंवा रुग्णांना उपचार मिळण्यात हयगय झाली, तर माफी नाही, असा इशारा दिला होता. यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. तसेच, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही महापालिका कारभारात लक्ष्य घातले आहे. त्यामुळे अजित पवार यांना पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील परिस्थिती हाताळता येत नाही का? असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित केला जात आहे.
धाक-दडपशाहीने माणसं कामाला लागत नाहीत…
याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, अजित पवार यांनी आपल्या कामाचे नियोजन केले पाहिजे. सकाळी मुंबईत, दुपारी पुण्यात, त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये दौरा केला पाहिजे. आठवड्यातून एक दिवस पुण्यात येवून परिस्थिती नियंत्रणात येणार नाही. त्यासाठी रोज शहरात भेट दिली पाहिजे. अधिकाऱ्यांवर धाक- दडपशाही करुन माणसं कामाला लागत नाही.लोकांना प्रेमाने बोलले पाहिजे. सकाळी ७ ते १ मुंबईत काम करावे, १ वाजता निघावे आणि १ ते ३ प्रवास करावा. ३ ते ५ पिंपरी-चिंचवडमध्ये काम करावे. त्यानंतर ५ ते ९ पुण्यात काम करुन रात्री १० वाजता पुन्हा मुंबईला जावे. मुळात मुंबईमध्ये कामे आहेत काय…हेच मला कळत नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांना लगावला आहे.