खेड तालुक्यातील गारगोटवाडीच्या पाणीटंचाईला सोलर प्लांटमुळे दिलासा
महिंद्रा आणि महिंद्राचा पुढाकार
पिंपरी-चिंचवड : खेड तालुक्यातील गारगोटवाडी गावात दीर्घकाळ चाललेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर आता सोलर पद्धतीच्या माध्यमातून तोडगा काढण्यात आला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लि. (इंजिन प्लांट), चाकण आणि यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गावात सौरऊर्जेवर आधारित सोलर पीव्ही पाणीपुरवठा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन महिंद्रा अँड महिंद्रा लि. (इंजिन प्लांट), चाकणचे प्लांट हेड संजय क्षिरसागर यांच्या हस्ते पार पडले. या वेळी गावचे सरपंच वर्षाताई बच्चे, उपसरपंच रोहिणी गारगोटे, यश फाउंडेशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील, तसेच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ कंद यांनी केले.यश फाउंडेशनचे स्वयंसेवक, थ्रिजी सोलर एनर्जीचे संचालक दीपक तारू यांचीही या उपक्रमात महत्त्वाची भूमिका होती.

हेही वाचा : सामाजिक विषमता दूर करण्याची जबाबदारी युवा पिढीवर; डॉ. वंदना बोकील
दररोज १.१० लाख लिटर पाणीपुरवठा
सोलर पीव्ही प्रणाली अंतर्गत २३ किलोवॅट सोलर पॅनल्स, २५ एचपी कंट्रोलर आणि १७.५ एचपी मोटरचा वापर करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकल्प सौरऊर्जेवर चालतो आणि दररोज १ लाख १० हजार लिटर स्वच्छ पाणी गावकऱ्यांना पुरवतो. या सुविधेचा थेट फायदा गारगोटवाडीतील १५५० ग्रामस्थांना होणार आहे.
महिला भगिनींना दिलासा
विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे महिलांना पावसाळ्यातही १-२ किमी पायी जाऊन पाणी आणावे लागत होते. वृद्ध महिलांसाठी तर ही प्रक्रिया अत्यंत कष्टदायक होती. सौरऊर्जेच्या मदतीने पाणीपुरवठा सुरळीत झाल्यामुळे महिलांची होणारी पायपीट थांबणार असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार
या वेळी बोलताना संजय क्षिरसागर म्हणाले, “महिंद्रा कंपनी गारगोटवाडीच्या पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय नजीकच्या काळात करण्यात येणार आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून स्वच्छ व पर्यावरणपूरक उपाययोजना केल्या असून, ही मोहीम कंपनी, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागातूनच शक्य झाली आहे. असेच एकत्रित प्रयत्न केल्यास गाव निश्चितच आदर्श गाव बनू शकतो.”





