तळेगाव-चाकण रोडवर दरोडा घालून ट्रकसह सव्वासात लाखांचा ऐवज पळवला
पिंपरी l प्रतिनिधी
साखर कारखान्यात ऊस खाली करून परत निघालेल्या ट्रक चालकाला कार मधून आलेल्या सहा जणांनी अडवले. त्यानंतर ट्रक चालकाचे अपहरण करून त्याचा ट्रक आणि रोख रकमेवर दरोडा घातला. हा प्रकार 19 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता तळेगाव-चाकण रोडवर घडला.
सुनिल गोपीचंद चव्हाण (वय 31, रा. हनुमान मंदीराच्या पायथ्याशी, करंजी चौकाजवळ, शिक्रापुर, पुणे. मूळ रा. मु.पो. गोकुळवाडी, ता. बदनापुर, जि. जालना) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 21) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाबासाहेब चतरु चव्हाण (रा. सुशी तांडा, ता. गेवराई, जि. बीड) व त्याचे सहा साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील हे ट्रक चालक आहेत. ते आणि त्यांच्यासोबत 15 लोक मिळून वेगवेगळ्या गावात जाऊन ऊस तोडून तो कासारसाई साखर कारखान्यात नेतात. 16 फेब्रुवारी रोजी त्यांनी ऊस भरून कारखान्यात नेला. मात्र कारखाना अचानक बंद झाला. त्यामुळे त्यांचा ट्रक 19 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाबारा वाजता खाली झाला. ट्रक खाली झाल्यानंतर ते मारुंजी, सोमाटणे मार्गे शिक्रापूरकडे जात होते. तळेगाव चाकण रोडवर दुपारी अडीच वाजता एक बोलेरो गाडी आणि एक दुचाकी त्यांच्या ट्रक समोर आली.
त्यातून आलेल्या आरोपींनी सुनील यांना जबरदस्तीने खाली उतरवले. त्यांच्याकडून ट्रकची चावी घेतली. दोघांनी ट्रक नेला. एकजण दुचाकीवरून गेला. तर चार जणांनी सुनील यांना जबरदस्तीने बोलेरोमध्ये बसवले. त्यांना मारहाण करून सायंकाळी पावणे सहा वाजता त्यांना शिक्रापूर जवळ रस्त्यावर सोडून दिले. दरम्यान सुनील यांच्याकडे असलेले 15 हजार रुपये आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतले. आरोपींनी सात लाख 15 हजारांचा ट्रक आणि 15 हजार रुपये रोख रक्कम दरोडा घालून चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एन ए पाटील तपास करीत आहेत.