लोकशाही मार्गाने न्याय मिळतो हे रिक्षा चालकांनी सिद्ध केले : बाबा कांबळे
- रॅपिडो बंदच्या निर्णयाचा भंडारा उधळून रिक्षा चालक मालकांनी केला आनंदोत्सव
पिंपरी : काही रिक्षा संघटनांनी रिक्षा चालकांना चुकीच्या मार्गाने आंदोलन करायला लावून अडचणीत टाकण्याचे काम केले. मात्र आपल्या मागण्या कायदेशीर मार्गाने देखील सोडविता येतात, ही भूमिका आम्ही घेतली. रॅपिडोच्या बेकायदेशीर प्रवासी वाहतूकीविरोधात न्यायालयात दाद मागितली. रस्त्यावरच्या लढाईबरोबर न्यायालयाची देखील लढाई आम्ही जिंकली आहे. हा ऐतिहासिक विजय असून लोकशाही मार्गाने न्याय मिळतो हे रिक्षा चालकांनी सिद्ध केले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.
रॅपिडो कंपनीच्या प्रवासी वाहतूकीवर बंदी घालण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. या आदेशाचे स्वागत करत पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा चालक मालकांनी केले. या वेळी रिक्षा चालकांनी भंडाऱ्याची उधळण केली. तसेच पेढे वाटून, फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला बाबा कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी, बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार, संतोष गुंड, मोहम्मद शेख, विलास केमसे पाटील मुराद काजी, सिद्धेश्वर सोनवणे, रवींद्र लंके, जाफरभाई शेख, सुनील कदम, अनिल गाडे, शुभम तांदळे, उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर पिंपरी चिंचवड, पुणे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलने झाली आहेत. काही रिक्षा संघटनांनी रिक्षा चालकांच्या अडचणींचा फायदा घेत आंदोलनाचा चुकीचा मार्ग अवलंबला होता. आक्रमक आंदोलनाचा मार्ग निवडला होता. त्यामुळे अनेक रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली. परंतु महाराष्ट्र रिक्षा पंचायतने या चुकीच्या गोष्टीला विरोध केला. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांचे गाऱ्हाणे शासनाकडे मांडण्याची भूमिका घेतली. संविधानिक मार्गाने आंदोलन करून देखील न्याय मिळतो ही भूमिका रिक्षा चालकांना पटवून दिली. कालांतराने ते सिद्ध देखील करून दाखवले.
रॅपिडो कंपनीने प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. त्याला आव्हान देणारी इंटरप्रिटेशन याचिका महाराष्ट्र रिक्षा पंचायत व इतर मित्र संघटनांनी केली. रस्त्यावरची लढाई जिंकली होती. न्यायालयातील लढाई जिंकण्याचे आव्हान होते. मात्र रिक्षा चालकांची वकिलांमार्फत योग्य भूमिका लावून धरली. अडचणी सांगितल्या. त्यामुळे न्यायालयाने देखील रिक्षा चालकांच्या बाजूने निर्णय देत रॅपिडोवर बंदी घातली. ही लढाई ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे रिक्षा चालक मालकांच्या आयुष्यात मोठा बदल आला असून या निर्णयाचा फायदा देशभरातील 15 कोटी रिक्षा, टॅक्सी, बस टू व्हीलर यांना होणार आहे. तर महाराष्ट्रातील 22 लाख रिक्षा चालक-मालकांना याचा फायदा होणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.
सार्वजनिक वाहतूक व्यवसाय करण्याचा अधिकार कोणालाही नाही. रिक्षा व टॅक्सी सेवा या कायदेशीर आहेत असे महत्त्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी आहे. बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांच्या नोंदी नाहीत, परमीट नाही, परवाना नाही. मग प्रवासी वाहतूकीला परवानगी कोणी दिली असे न्यायालयाने संबंधीतांना फटकारले, असे बाबा कांबळे यांनी सांगितले.