मिशन- २०२२ : महापालिका निवडणूक प्रभाग रचनेत महाविकास आघाडीकडून दबाव?
![Mission-2022: Pressure from Mahavikas Aghadi in the formation of municipal election wards?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/मिशन-२०२२-महापालिका-निवडणूक-प्रभाग-रचनेत.jpg)
भाजपा प्रवक्ते अमोल थोरात यांचे राज्य निवडणूक आयुक्तांना निवेदन
प्रभाग रचना करताना राजकीय हस्तक्षेप, दबावतंत्र वापरण्याची शक्यता
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थज्ञंच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना भौगोलिकदृष्टया अचूक होणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘गुगल अर्थ’ या ॲप्लिकेशनचा वापर करण्यात यावा. तसेच प्रभाग रचनेत पारदर्शकता असावी म्हणून राजकीय हस्तक्षेप खपवून घेवू नये, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजपाचे मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात थोरात यांनी निवडणूक आयुक्तांना निवेदन दिले आहे.
प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप, दबावतंत्र वापरले जावू शकते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे राज्याच्या सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष प्रभाग रचनेत हस्तक्षेप करु शकतात. शहरात नदी, नाले, रेल्वेमार्ग, महामार्ग असून, त्यामुळे ठराविक भागाची भौगोलिकदृष्टया विभागणी झाली आहे. त्या प्रत्येक भागातील वस्ती व तेथील रोजगार, राहणीमान आदी बाबतीत बदल असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्येक भागातील समस्या विभीन्न आहेत. भौगोलिक सीमांचा विचार करुन विकासाचा समतोल साधणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रभाग रचना भौगोलिक सीमांचा विचार होणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करता प्रभाग रचना पारदर्शकपणे होणे आवश्यक आहे. त्यात राजकीय हस्तक्षेप तसेच दबावतंत्र वापरण्यात येवू नये. तसेच गुगल अर्थ या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर प्रभाग रचनेसाठी करावा, अशी मागणी अमोल थोरात यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महाविकास आघाडीकडून प्रभागांची मोडतोड होण्याची शक्यता…
राज्यातील महापालिकांमध्ये आपली सत्ता आणण्याच्या विचाराने सत्ताधाऱ्यांना पछाडले आहे. त्यासाठी प्रभाग रचना करताना त्यांच्याकडून हस्तक्षेप तसेच दबावतंत्राचा वापर होवू शकतो. त्यामुळे त्यांना अपेक्षीत असलेली वॉर्ड रचना त्यांच्याकडून करुन घेतली जावू शकते, असे करताना भौगोलिक सीमाकडे दुर्लक्ष करुन केवळ मतांचा विचार केला जाईल. त्यामुळे प्रभागांची मोडतोड होण्याची शक्यता आहे, असेही भाजपाचे मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी म्हटले आहे.