उपेक्षित, वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम महात्मा गांधींनी केले : सज्जी वर्की
![Mahatma Gandhi worked to bring justice to marginalized, deprived citizens: Sajji Varki](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-02-at-11.29.32-PM-780x470.jpeg)
पिंपरी : ब्रिटिशांच्या वसाहतवादाला अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करीत भारतात स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी उभारली. महात्मा गांधी हे निष्णात वकील होते. त्यांच्याकडे राष्ट्रवादी विचार आणि राजकीय नैतिकतावाद होता. भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव महात्मा गांधी यांच्यावर होता. त्यांनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग कधी सोडला नाही. स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे. सत्याग्रही पद्धतीने उपोषण करून त्यांनी एक आदर्श देशापुढे ठेवला आहे. उपेक्षित, वंचित समाजातील नागरिकांना सन्मानपूर्वक न्याय मिळवून देण्याचे काम महात्मा गांधींनी केले आहे. जातिभेद, धर्मभेद, वंशभेद नाकारून त्यांनी मानवतावादाचे विचार दिले. आज जगामध्ये सर्वत्र वंशवादामुळे युद्धजन्य परिस्थिती आहे. रशिया, युक्रेन सारखे देश युद्धज्वर वाढवत आहे अशावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अहिंसेचे तत्व जगाला मार्गदर्शक ठरणार आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड काँग्रेसचे सरचिटणीस सज्जी वर्की यांनी केली. तसेच निस्वार्थी भावनेने देशसेवा कशी करावी याचे आदर्श उदाहरण स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी आपल्यापुढे ठेवले आहे.
अशा नेत्यांचे विचार देशाला स्थिरता आणि स्थैर्य देतील असेही सज्जी वर्की म्हणाले.
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वर्गीय पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, गौरव चौधरी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, विक्रांत सानप, जय ठोंबरे, हृषीकेश जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.