‘मराठवाड्यातील कष्टकरी कामगारांच्या हक्कासाठी एकत्र लढू’; काशिनाथ नखाते
नांदेड व लातूर जिल्हा दौऱ्यातील कामगार संपर्क अभियानावेळी कष्टकरी कामगारांना घातली साद
![Kashinath Nakathe said that we will fight together for the rights of the hardworking workers of Marathwada](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Kashinath-Nakhate-780x470.jpg)
पिंपरी | नांदेड, लातूर, औरंगाबाद, धाराशिवसह मराठवाड्यातील कष्टकरी कामगारांत विविध कौशल्य आहेत. कामगारांकडे गुणवत्ता आहे. मात्र विभागवार कामाची उपलब्धता करून देण्यात सरकार अपयशी ठरलेले असून मराठवाड्यातील कष्टकरी कामगाराना किमान व समान वेतन, कामाची हमी असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित लढू या.. अशी साद कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज नांदेड लातूर जिल्हा दौऱ्यात केली.
नांदेड आणि लातूर जिल्हा येथे विविध ठिकाणी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे कामगार संपर्क अभियानात बैठकांचे आयोजन करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्हा अध्यक्ष परमेश्वर मठपती, लातूर जिल्हा अध्यक्ष गोपाळ वाडीकर, प्रदेश संघटक विनोद गवई, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, नायगाव तालुका अध्यक्ष अशोक टोकलवाड, देगलूर तालुका अध्यक्ष पंढरी भोईवाड, यादवराव चोपडे,निमंत्रक लक्ष्मण टोकलवाड, मेरसाब शेख, संतोष कुडके, वजीर शेख, संजय तळणे, नागोराव टोकलवाड यांचे सह विविध तालुका प्रतिनिधी उपस्थित राहिले.
हेही वाचा – Pune | लोणावळ्यात चक्क ‘पॉर्न फिल्म’चे शुटींग, १३ जणांना अटक
सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत नांदेड शहर, नरसी, खानापूर, देगलूर, लातूरशहर, निलंगा, औसा येथे बैठकीचे सत्र घेण्यात आले. विविध ठिकाणी नखाते यांचे कामगारांनी स्वागत केले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की, मराठवाड्यामध्ये विविध कुशल कामगार आहेत त्यांच्या कामाचा एक वेगळा दर्जा आहे मात्र मराठवाड्यात त्यांना कामाची उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना स्थलांतर करावे लागते हे स्थलांतर रोखण्यासाठी व विभाग वार कामाची उपलब्धता करून देणे सरकारचे काम आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मनरेगा सारख्या योजनाला सरकारने खिळ घातलेली असून या महत्त्वपूर्ण योजनेस निधी देणे बंद केले आहे त्यातून कामाची उपलब्धता होत नाही. शेतमजुराना सुरक्षा नाही, मराठवाड्यातील रिक्षाचालक, वाहनचालक, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, फेरीवाला, कंत्राटी कामगार यांना एकत्र करून ही लढाई ताकतीने पुढे नेण्याचा निश्चयही यावेळी करण्यात आला.
नांदेड जिल्हा अध्यक्ष मठपती म्हणाले की, आज कामगारांना संरक्षणाची गरज आहे विविध ठिकाणी काम केल्यानंतर हे त्याच्या पगारासाठी वेतनासाठी अनेक वेळा चकरा मारावे लागतात तर अनेक ठिकाणी पैसे बुडवले जातात किमान वेतन मिळणे गरजेचे आहे.
प्रस्तावना उपाध्यक्ष राजेश माने यांनी केले तर आभार मिरसाब शेख यांनी मानले.