देशपातळीवर ओबीसींचा दबावगट निर्माण होणे आवश्यक – प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ
![It is necessary to form a pressure group of OBCs at the national level - Principal Dr. Dattatraya Balsaraf](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/PHOTO-15-sca.jpg)
पिंपरी – लोकसंख्येच्या तुलनेत देशभरात ओबीसींची संख्या सर्वात जास्त आहे. परंतू आरक्षणाच्या तुलनेत राजकारणात तेवढ्या संधी ओबीसींना दिल्या जात नाहीत. यासाठी राज्यासह देशपातळीवर ओबीसींचा दबावगट निर्माण होणे आवश्यक आहे. ओबीसींमध्ये माळी समाज संख्येने जास्त आहे. महाराष्ट्रात माळी समाज एकूण लोकसंख्येत दुस-या क्रमांकावर आहे. मात्र या समाजाला राजकीय क्षेत्रात फारसी संधी दिली जात नाही.
ब-याचवेळा सर्वच पक्षात हेतूपुरस्पर डावलले जाते. याचा विचार करुन राजकारणात पुढे जाऊ इच्छिणा-या व्यक्तींच्या मागे समाजातील सर्व घटकांनी उभे रहावे. तरच आगामी काळात माळी समाजातील राजकीय व्यक्ती किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकते. ओबीसी प्रवर्गातील इतर समाजबांधवांना देखिल त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहर माळी महासंघाच्या वतीने गुरुवारी पिंपरीतील सावित्रीबाई फुले सभागृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्राची नविन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. बाळसराफ बोलत होते.
यावेळी माळी महासंघाचे राष्ट्रीय विश्वस्त काळूराम आण्णा गायकवाड, प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे, प्रदेश उपाध्यक्ष हिरामण भुजबळ, विलास गव्हाणे, राखी भुजबळ, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष गोविंद आल्हाट, नगरसेवक संतोष लोंढे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, पुणे शहर माळी महासंघाचे अध्यक्ष दिपक जगताप, पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष नेहूल कुदळे, दिलीप बनकर, रविंद्र आल्हाट, नवनाथ बोराटे, मनिषा कुदळे, किर्ती जाधव, सिध्देश आल्हाट, संजय तळेकर, सोपान हिंगणे, संतोष बोराटे, संतोष जाधव, प्राची जाधव, गणेश जाधव आदी उपस्थित होते.
पुणे शहर अध्यक्ष दिपक जगताप म्हणाले की, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामिण भागात ओबीसींची एकजूट चांगली आहे. शहरी भागात युवक, युवतींनी समाजाचे संघटन उभारण्यासाठी पुढे यावे. युवकांचा दबावगटच पुढील टप्प्यात ओबीसींना हक्क मिळवून देण्यात यशस्वी होईल असे दिपक जगताप म्हणाले.
प्रास्ताविक काळूराम गायकवाड, स्वागत गोविंद आल्हाट, सुत्रसंचालन नेहूल कुदळे आणि आभार दिलीप मामा बनकर यांनी मानले.