आयटी कंपनीच्या माहितीची अफरातफर : साडेचार कोटींच्या फसवणूक प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/fraud-1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
कंपनीच्या माहितीची अफरातफर करून कंपनीकडे येणारी कामे स्वतःच्या कंपनीकडे वाळवून कामगारांनी कंपनीची साडेचार कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडी फेज वन मधील एस जी एस टेलिकॉम लिमिटेड या कंपनीत घडला.
वामन नारायण वाघ (वय 42, रा. चौधरी पार्क, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संजय सुरेश बारी (वय 34, रा. ताथवडे), दिनेश शर्मा (रा. नवीमुंबई ), अरुण कुमार के एन (रा. श्रीगंधनगर, बेंगलोर), प्रियांका संजय बारी (रा. जळगाव), गणेश विठ्ठल पाटील (रा. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय बारी, अरुण कुमार, दिनेश शर्मा हे फिर्यादी यांच्या कंपनीत विविध पदांवर काम करत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या व नातेवाईकांच्या नावे जळगाव आणि अमेरिका येथे दुसरी कंपनी स्थापन केली. फिर्यादी यांच्या कंपनीकडे येणारी कामे आरोपींनी स्वतःच्या कंपनीकडे वळवली. त्यासाठी फिर्यादी यांच्या कंपनीतील माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित डेटाची अफरातफर केली. कंपनीच्या करारातील अटींचा व विश्वासार्हतेचा भंग केला. सुमारे साडेचार कोटी रुपयांची कामे आरोपींनी त्यांच्या कंपनीकडे वळवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोन्याबापू देशमुख तपास करीत आहेत.