आयटी कंपनीतील डेटा चोरी करून ८२ कोटींचे नुकसान करणाऱ्या तिघांना अटक
सायबर पोलिसांची मोठी कामगिरी
पिंपरी चिंचवड : कंपनीचे गोपनीय सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन चोरून नवीन कंपनी स्थापन करून ८२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
बिश्वजीत मिश्रा (४५, बाणेर, पुणे), नयुम शेख (४२, कोंढवा, पुणे), सागर विष्णू (३९, रहाटणी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दत्तात्रय प्रभाकर काळे (४५, थेरगाव, पुणे) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना एप्रिल २०२४ पासून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत हिंजवडी येथील फ्युचरिइम टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनीत घडली.
हेही वाचा : गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार
पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळे यांची हिंजवडी येथे आयटी कंपनी आहे. त्यामध्ये आरोपी काम करत होते. आरोपींनी संगनमत करून कंपनीसोबत केलेल्या कराराचा भंग केला. फिर्यादीच्या कंपनीतील गोपनीय आणि कॉपीराईट संरक्षित सोर्स कोड व सॉफ्टवेअर सोल्यूशनची चोरी केली. तसेच, १०० बेकायदेशीरपणे विकसित केलेल्या वेबसाइटचा मोबदला, अपॉर्च्युनिटी लॉस आणि इतर सेवांच्या माध्यमातून कंपनीचे ८२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले. आरोपींनी नवीन कंपनी स्थापन करून स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादीच्या कंपनीतील सॉफ्टवेअर सोल्यूशन आणि सोर्स कोडचा वापर केला.
याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी आरोपींच्या बाणेर येथील कंपनीमध्ये छापा मारून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लॅपटॉप, चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. काळे यांच्या कंपनीचे यूएस येथील ग्राहक कंपनीसोबत मिळून आरोपींनी हा गुन्हा केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. न्यायालयाने आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.





