गणेशोत्सवात पहिल्या दिवशी गर्दी केल्यास दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय – अजित पवार
![If there is a crowd on the first day of Ganeshotsav, a tough decision on the second day - Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Ajit-Pawar.jpg)
पिंपरी चिंचवड | पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढीवर शासनाचा भर असून प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध लावण्यात येणार नाहीत. मात्र, नागरीकांनी गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, खासदार गिरीश बापट, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार चेतन तुपे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील टिंगरे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, आमदार मुक्ता टिळक तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील कोविड लसीकरणाबाबत समाधान व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण गतीने करण्यावर शासनाचा भर आहे. सामाजिक दायित्वातून क्रांतिदेवी बजाज ट्रस्टने दीड लाख लस दिली, हे कौतुकास्पद आहे. स्वंयसेवी संस्थांचे अशा कार्यातील योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय जेव्हा होईल तोपर्यंत सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात मोठे यश आले आहे. खासगी संस्थांमध्येही लसीकरणाचे प्रमाण वाढवा, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.ते म्हणाले की, कोरोनावर संपूर्ण मात करण्यासाठी आपण सर्वजण गत दीड वर्षांपासून सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. महानगरासह ग्रामीण भागात काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येऊ शकते. ही संभाव्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मात्र, तिसरी लाट येऊ नये यासाठी नियमांचे पालन अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, स्वच्छता, सुरक्षित अंतर यांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
निलम गोऱ्हे यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत लहान मुलांची काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच रुग्णालयातील बेड उपलब्ध्ता तसेच आरोग्य योजनाबाबतचा तपशील, संपर्क क्रमांक याबाबत दर्शनी भागात फलक लावावेत, असे निर्देश त्यांनी दिले.खासदार गिरीश बापट यांनी ग्रामीण भागात उपचाराच्या सुविधा सुसज्ज ठेवा, जेणेकरून ग्रामीण भागातील रुग्णांना त्याठिकाणीच व्यवस्थितपणे उपचार मिळतील, असे सांगितले.