‘आरक्षण टिकवायचे असेल तर संविधानाची सुरक्षितता गरजेची’; प्रा. प्रकाश पवार
भारतीय संविधान जनजागरण अभियानामध्ये 'संविधान आणि आरक्षण' विषयी मंथन
पिंपरी : सध्या महाराष्ट्रातील ज्वलंत विषय झालेल्या आरक्षण प्रश्नी समाजात निर्माण झालेली दरी ही चिंतेची बाब असून आरक्षण टिकवायचे असेल तर संविधानाची सुरक्षितता गरजेचीअसल्याचे प्रतिपादन भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक,राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांनी आज येथे केले.
पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, संत रोहिदास विचार मंच यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भारतीय संविधान जनजागरण अभियानामध्ये ‘संविधान आणि आरक्षण’ या विषयावर ते बोलत होते.
गणेश तलाव येथील संत रोहिदास विचार मंचाच्या सभागृहात या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, संत रोहिदास धर्म संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव वाघमारे, माजी आमदार बाबुराव माने आदी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा – ‘..तर आम्ही निर्णय घेणार’; बच्चू कडूंचा महायुती सरकारला इशारा
यावेळी मानव कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय उबाळे यांनी केले तर लक्ष्मण मुदळे यांनी आभार मानले.
विष्णु सातपुते, संतोष वाघमारे, सी टी कदम, पांडुरंग वाघमारे, गौतम जाधव, अनिल सुर्यवंशी, उत्तम मोरवेकर आदींनी संयोजनासाठी पुढाकार घेतला.
जातीयवाद बळकट होत असल्याची खंत…
प्रा. पवार म्हणाले,आरक्षण हि संविधानाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्याच्यामुळेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ,भटक्या विमुक्त जाती जमाती ,इतर मागासवर्गीय समाजाचा उद्धार झाला आहे. विशेषता शैक्षणिक आरक्षणाने आपल्या देशात क्रांती घडवली आहे. पण ती पूर्णत्वास जाण्या अगोदरच या आरक्षणात खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू झाला.संविधान संपलं तर आरक्षण संपेल,आरक्षण टिकवायचे असेल तर संविधान वाचले पाहिजे, ते बळकट केले पाहिजे. संविधानामुळे आपला देश जगातला शक्तिशाली लोकशाही देश बनेल.आरक्षण हे प्रवर्गाला दिले जाते, जातीला नाही. आज आरक्षणाच्या नावाखाली जाती-जातीमध्ये संघर्ष सुरू झाला आहे . जातीयवाद बळकट होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.