पिंपळे निलख परिसरातील पाणीटंचाई विरोधात ‘‘हंडा मोर्चा’’
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांचा इशारा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपळे निलख येथील विशाल नगर परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार गजानन कामठे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाला दोन दिवसांत परिस्थिती सुरळीत करण्याचा इशारा दिला आहे.
कामठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे निलख परिसरात गेल्या काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही टंचाई नैसर्गिक नसून जाणीवपूर्वक निर्माण केली जात असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा मुख्यमंत्री होणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ठरला
तसेच, पिंपळे निलख येथील पाणी नवी सांगवीकडे वळवले जात असल्याचेही निदर्शनास येत असल्याचा आरोप त्यांनी केला. “पिंपळे निलख हे देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येते, त्यामुळे येथील नागरिकांवर अन्याय होता कामा नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.
टँकर माफियांचा हस्तक्षेपही या टंचाईमागे असू शकतो, असा संशय व्यक्त करत कामठे यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, प्रशासनाने तात्काळ चौकशी करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महानगरपालिकेवर ‘हंडा मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशारा कामठे यांनी दिला असून, त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
पिंपळे निलखमधील पाणीटंचाई ही नैसर्गिक नसून पूर्णपणे कृत्रिम आहे. नागरिकांना जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवून टँकर माफियांचा फायदा करून दिला जात असेल, तर हे अजिबात सहन केले जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून दोन दिवसांत नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र ‘हंडा मोर्चा’ काढू. नागरिकांच्या हक्कासाठी कोणतीही लढाई लढायला आम्ही तयार आहोत.
– तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट.





