महात्मा गांधी यांना महापालिकेच्या वतीने अभिवादन
पिंपरी | भारतीय स्वातंत्र्य लढा अहिंसेच्या मार्गाने उभा करून ब्रिटीश राजवटीविरुध्द महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याची चळवळ यशस्वी केली. त्यांचे कार्य आणि विचार सतत मार्गदर्शक राहतील अशा शब्दात उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.महात्मा गांधी यांनी उभी केलेली चळवळ, सत्याग्रह तसेच विविध आंदोलने सर्वव्यापी होते, असे सांगून उपमहापौर घुले म्हणाल्या, देश हितासाठी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याकडे गांधीजींचा कल होता. सत्य आणि अहिंसेचे तत्व त्यांनी अंगिकारले होते. देशासाठी गांधीजींनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे त्या म्हणाल्या.