Good News: पवना धरण १०० टक्के भरले; पिंपरी-चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली..!
आता प्रतीक्षा नियमित पाणी पुरवठ्याची : प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ मावळवासियांची तहान भागविणारे पवना धरण आज मंगळवारी (दि.२२) सायंकाळी चारपर्यंत १०० टक्के भरले आहे. त्यामुळे वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
यंदा मौसमात पावसाने उशिरा हजेरी लावली. जून महिना कोरडा गेल्यांतर जुलै महिन्यात पाऊस सुरू झाला. त्यामुळे १७ टक्क्यांवर पोहोचलेले पवना धरणात पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली. धरण क्षेत्रात पाऊस कायम असल्याने धरण निम्मे २० जुलैच्या दिवशी भरले होते. त्या महिन्याअखेरीस धरणातील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. दोन ऑगस्टला पाणीसाठा ९० टक्के झाला होता.
दरम्यान, पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने ३ ऑगस्टपासून तीन दिवस १,४०० क्सुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग बंद करण्यात आला. विश्रांतीनंतर पावसाची संततधार सुरू झाल्याने पाणीसाठा वाढीस सुरुवात झाली. १३ ऑगस्टला धरण ९६ टक्के भरले. पाऊस कमी असला तरी, धरणात साठा हळूहळू वाढू लागला.
आजपर्यंत एकूण २,१६२ मिलिमीटर पाऊस
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्युतगृहाऐवजी धरणाच्या सांडव्यातून १५ ते १७ ऑगस्ट असे तीन दिवस पाणी सोडण्यात आले. साठा वाढल्याने सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत धरण ९९.७२ टक्के भरले होते. धरणात ८.४८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. आज ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरण १०० टक्के भरले आहे. यावर्षी १ जून पासून आजपर्यंत एकूण २,१६२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह मावळमधील काही भागांचा तसेच एमआयडीसीच्या वर्षभराचा पाण्याची चिंता मिटली आहे.