कोरोनामुळे निराधार झालेल्या विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करा- इखलास सय्यद
![Forgive the school fees of the students who became destitute due to corona - Ikhlas Syed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/WhatsApp-Image-2021-09-22-at-2.26.14-PM-e1637299329107.jpeg)
पिंपरी चिंचवड | कोरोना महामारीत पिंपरी-चिंचवड शहरातील अनेकांना जीव गमवावा लागला. काही कुटुंबातील पती – पत्नींचे दुर्दैवी निधन झाल्याने त्यांची मुले निराधार झाली आहेत. या मुलांची शालेय फी माफ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस इखलास सय्यद यांनी केली.याबाबत उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. त्यात सय्यद यांनी म्हटले आहे की, कोविड 19 या जागतिक महामारीची झळ आपल्या पिंपरी- चिंचवड शहरालाही बसली. शहरातील अनेक रुग्ण (नागरिकांना ) आपला जीव गमवावा लागला.त्यामुळे अनेक महिलांना अकाली वैधव्य आले. प्रपंच चालविणेही अशक्य झाले. तर, काही कुटुंबात दोघे पती – पत्नींचे दुर्दैवी निधन झाल्याने त्यांची मुले निराधार झाली आहेत.
अशा दोन्ही वर्गातील मुलांना ( विध्यार्थ्याना ) ‘ शालेय फी भरणे अशक्य असल्याने त्यांचे पुढील शिक्षण घेणे दुरापास्त झाले आहे. कारण आई आहे परंतु वडील गेल्याने उत्पन्नचे कोणतेही स्रोत नाही. तर आई – वडील दोघे गेल्याने मुले निराधारच झाली आहे. त्यामुळे कोविड ‘ काळात निराधार झालेल्या, अथवा वडील गेल्याने कुटुंबात उत्पन्नाचे साधन नसलेल्या शालेय मुलांची ( विद्यार्थ्यांची) संपूर्ण शालेय ‘ फी ‘ माफ करण्यात यावी, अशी मागणी सय्यद यांनी केली.