कर्मचाऱ्यांनो.. यापुढे बदल्यांसाठी राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई, महापालिका आयुक्तांचा इशारा
![No entry into government office without prior permission, Collector orders](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Rajesh-patil.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ठराविक विभागात बदली मिळण्यासाठी काही अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव आणून प्रशासनास वेठीस धरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे पुढाऱ्यांमार्फत असा दबाव आणणा-या अधिकारी, कर्मचा-यांची कृती संशयास्पद समजून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.सरकारी अधिकारी, कर्मचारी त्यांच्या सेवाविषयक बाबींसंबधींच्या तक्रारींचे निवारण करून घेण्यासाठी तसेच वैयक्तिक कामे करून घेण्यासाठी राजकीय कार्यकर्ते आणि अन्य अशासकीय व्यक्ती यांच्यामार्फत दबाव आणतात. मात्र, असे प्रकार आढळून आल्यास ते शिस्तभंग कारवाईस पात्र ठरतात.
अशा अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 6 जानेवारी 1995 रोजीच्या परिपत्रकानुसार कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्या अनुषंगाने सरकारी अधिकारी, कर्मचा-यांनी त्यांच्या सेवेसंबंधींच्या कोणत्याही बाबींसंबंधात राजकीय पुढा-यांकडून दबाव आणणे ही गैरवर्तणूक आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिका आस्थापनेवर विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यासंदर्भात महापालिकेच्यावतीनेही 13 फेब्रुवारी 2015 रोजीच्या परिपत्रकानुसार धोरण निश्चित करण्यात आले आहे. प्रशासनामार्फत करण्यात येणा-या बदल्या या सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने केल्या जातात.
अशा बदल्या करताना महापालिकेच्या सर्व विभागांचे कामकाज सुरळीतपणे पार पडेल, सर्व विभागात आवश्यक त्या प्रमाणात कर्मचारी कार्यरत राहतील, अशा प्रकारचे नियोजन प्रशासनामार्फत केले जाते. तथापि, काही अधिकारी, कर्मचारी बदली करण्यात आलेल्या किंवा नियुक्त केलेल्या विभागांमध्ये रूजू होत नाहीत.
बदली रद्द करण्यासाठी तसेच महापालिकेच्या काही विशिष्ट विभागांमध्येच वारंवार बदली किंवा पदस्थापना मिळविण्यासाठी राजकीय पदाधिकारी आणि अशासकीय व्यक्तींमार्फत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. अशा अधिकारी, कर्मचा-यांची सचोटी संशयास्पद असल्याचे स्पष्ट होते. यामुळे प्रशासनासमोरील उद्दीष्टपूर्ती करता येत नाही. परिणामत: बदल्यांसंदर्भात धोरणाची अंमलबजावणी करताना प्रशासनाला अडचणीचे ठरते.
ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी 10 जानेवारी रोजी पुन्हा परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, बदली मिळण्याबाबत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव आणून प्रशासनास वेठीस धरल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचा-यांची ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे उल्लंघन करणारी ठरते. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचा-यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा आयुक्तांनी दिला आहे.