नगरसेविका अर्चना बारणे यांचा मृत्यू डेंग्यूने नाही; महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा अहवाल
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगांव येथील भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे खाजगी रुग्णालयाने कळविले होते. परंतू, महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाने डेंग्यू निदानासाठी रक्तजल नमुना सेंटिनल सेंटरमध्ये तपासणी पाठवण्यात आला. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे बारणे यांचा मृत्यू डेंग्यू आजाराने झालेला नाही, असे स्पष्टीकरण अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डाॅ. पवन साळवे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
तसेच थेरगांव परिसरात एक हजार 259 घरांचे कंन्टेनर सर्वेक्षण करण्यात येत असून डास नियंत्रणाची कार्यवाही सुरु आहे, असेही म्हटले आहे.हिवताप हा आजार एनॉफिलस व डेंग्यु, चिकुनगुन्या हे आजार पसरवण्यास एडिस इजिप्ताय हे डास कारणीभुत असतात. एनॉफिलस अस्वच्छ व एडिस डासांची मादी घरात साठलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते. या अंड्यातुन बाहेर पडणा-या डासांच्या अळ्या त्याच पाण्यात वाढतात. ४-५ दिवसानंतर या अळ्याचे कोष बनतात. हे कोषही पाण्यातच जिवंत राहतात. कोषातुन २ दिवसांनी डास बाहेर पडतात. याचाच अर्थ डासांच्या उत्पत्तीसाठी साठलेल्या पाण्याची आवश्यकता असते.
आपण घरात पाण्याची साठवण करतो. घराभोवतीच्या परीसरात साठलेले सांडपाणी असे साठलेले पाणी डासांच्या वाढीस उपयुक्त असते. साठलेल्या पाण्यात डासांच्या अळया वाढल्या. तरी आपण त्याकडे विशेष लक्ष देत नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती विनासायास होते. डासांच्या अंडयापासुन त्यांचा डास होण्यास ०८-१० दिवसांचा कालावधी लागतो.
आपण जर दर आठवडयास साठलेले पाणी एकदा पुर्णपणे वापरुन ड्रम कोरडा केला, सुकवून नंतर परत भरला तर त्या पाण्यात असलेल्या पण नजरेस न दिसणा-या अंडी/अळया मारल्या जातील. घराभोवतीच्या साठलेल्या पाण्याची डबकी बुजविली किंवा साठलेले पाणी वाहते केले तर डासांच्या उत्पत्तीस आळा बसेल.
तसेच पावसाळयात घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर आपण टाकलेल्या भंगार मालात पाणी साचते. हे पाणी फेकुन देण्याचे आपल्या लक्षातही येत नाही. पाऊस गेल्यावर उन्हामुळे या वस्तु आपोआप वाळतील अशा दृष्टिने आपण त्याकडे पाहातही नाही. पण याच पाण्यात डासांची भरपुर वाढ होऊ शकते. हिवताप/ डेंग्यु/ चिकुनगुन्या या रोगाचा प्रसार वाढु नये म्हणुन डास उत्पत्तीवर नियंत्रण गरजेचे आहे.