समरसतापूर्ण व्यववहारातून भारत विश्वगुरू
![Bharat Vishwaguru through harmonious behavior](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Sunil-devdhar-780x470.jpeg)
सुनील देवधर : कलारंग संस्थेतर्फे ‘‘भविष्यातील भारत” या विषयावर व्याख्यान
पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
भारत देश बदलत आहे. पुढे जात आहे. “एक भारत, श्रेष्ठ भारत” ख-या अर्थाने प्रत्यक्षात घडत आहे. गरिबी संपली, समस्या संपल्या असे म्हणणे मुळीच नाही. परंतु, समस्या संपविण्याकडे घेऊन जाण्यासाठीचा रस्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला आहे. आपला भारत देश विश्वगुरू बनवायचा आहे. त्यामुळे आपण नामानिराळे राहून चालणार नाही. त्यासाठी समरसतापूर्ण व्यवहार महत्त्वाचा असून जाती-पाती उखडून फेकल्या पाहिजेत. तरच आपण विश्वगुरू होणार आहोत, असा मोलाचा संदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी चिंचवड येथे आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिला.
कलारंग संस्थेचे २५ वर्षात पदार्पण केले, या निमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पिंपरी चिंचवड यांच्या वतीने शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित कार्यक्रमात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व भविष्यातील भारत” या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर पद्मश्री गिरीश प्रभुणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी विनोद बन्संल, मुकुंद कुलकर्णी, हेमंत हरहरे, मिलिंद देशपांडे, विनायक थोरात, माहेश्वर मराठे, माजी खासदार अमर साबळे, आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, शंकर जगताप, एकनाथ पवार, नामदेव ढाके, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, राजू दुर्गे, मोरेश्वर शेंडगे, योगेश बाबर आदी उपस्थित होते. कलारंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व आयोजक अमित गोरखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.
…म्हणून, लोकांनी नरेंद्र मोदींना निवडलं
मोदी मुख्यमंत्री असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तू विक्रीतून ३०० कोटी मिळाले. ते मुलींच्या शौचालयासाठी दिले. दुसरे मुख्यमंत्री स्वत:साठी सरकारचे ३०० कोटी खर्च करतात. हा फरक पाहून लोकांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून निवडलं. कोट्यवधी लोकांना घरे दिली. विमा योजना, आयुष्यमान भारतसारख्या योजना दिल्या. प्रत्येक गोष्टीतून दलाली काढून टाकण्याचे काम केले. राष्ट्रीय शिक्षण धोरण आणून प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा निश्चय केला. दलाली बंद करून थेट लोकांपर्यंत, गरिबांपर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत मदत पोहचविण्याचे काम ते करत आहे.