पुरंदर विमानतळाच्या भू संपादनासाठी स्वेच्छा खरेदी जाहीर करा; आमदार विजय शिवतरे आग्रही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/pune-10-3-780x470.jpg)
पिंपरी : समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी रेडीरेकनरच्या पाच पट दर देत, स्वेच्छा खरेदीची मुभा दिल्याने शेतकर्यांचा भूसंपादनासाठी असलेला विरोध मावळला. त्यामुळे समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण झाले. याधर्तीवर पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने स्वेच्छा खरेदी जाहीर करावी, अशी आग्रही मागणी पुरंदरचे आमदार विजय शिवतरे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील विधि विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6) मोशी येथे पार पडले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार शिवतरे यांच्याशी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवतरे म्हणाले, पुरंदरचे नियोजित विमानतळ हे राज्याच्या दृष्टीने ग्राोथ इंजिन आहे. तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीने समृद्धी महामार्गाला विरोध केला होता. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी स्वेच्छा खरेदी योजना जाहीर केली होती. ज्यांना या प्रकल्पासाठी जागा द्यायची आहे, त्यांनी द्यावी, अशी ही योजना होती. तसेच रेडी रेकनरच्या पाच पट दर दिला होता. याशिवाय घर, विहीर, झाडे यांचादेखील समाधानकारक दर मिळाल्याने शेतकर्यांनी स्वत:हून या प्रकल्पाला आपली जमीन दिली होती. या योजनेचा उल्लेख करत, आमदार शिवतरे म्हणाले की, पुरंदर विमानतळासाठी राज्य सरकारने स्वेच्छा खरेदी योजना लागू करावी. याशिवाय रेडीरेकनरच्या पाचपट दर मिळाल्यास शेतकर्यांचा फायदा होत असले, जर शेतकरी एक एकर जमीन विकून त्या मोबदल्यात तो पुरंदर तालुक्यातच पाच एकर जागा विकत घेत असले, तर अडचण काय आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा – विद्यार्थी खेळाडूंचे प्रस्ताव राज्य बोर्डाने मागवले
याठिकाणच्या भूसंपादनासाठी लोकांना, शेतकर्यांना विश्वासात घ्यावे लागेल. मात्र एमआयडीसीच्या जमीन संपादन कायद्यानुसार भूसंपादन केल्यास शेतकरी मरून जाईल. भू संपादन बंधनकारक न करता स्वेच्छा खरेदीने जागा ताब्यात घ्या. ज्याला जागा द्यायची आहे, तो देईल, नसेल द्यायची तर नंतर पाहू. पण स्वेच्छा खरेदीमध्ये शेतकर्यांचा, त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा फायदा होणार आहे, असे सांगत एखादे धरण बांधल्यास 30 किलोमीटर अंतरावरील शेतकर्यांचा फायदा होतो. पुरंदर तालुक्यात एअरपोर्ट झाल्यास त्याठिकाणची गृहसंकुले, शाळा, व अन्य व्यवसाय या सगळ्यांचा फायदा पुरंदरच्या पुढच्या पिढ्यांना होणार आहे.
पुरंदरमधील नियोजित विमानतळामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणच्या जागांची विक्री वाढली आहे. यामध्ये अदानीसारख्या उद्योगपतींकडूनही तालुक्यात जमीन खरेदी केली जात आहे. मात्र. धाकदपटशा दाखवून, खासगी सावकारांकडून होणारी नागरिकांची लुबाडणूक मी आमदार झाल्यानंतर बंद केली आहे, असे ते म्हणाले.