सगळ्या राज्याचे चित्ररथ कंटाळवाणे होऊ शकतात – चंद्रकांत पाटील
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
‘राजधानी दिल्लीत प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नसल्याने राजकारण सुरू आहे. आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. कशाचेही खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडले जात आहे. चित्ररथाचा विषय तांत्रिक आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ या पूवीर्ही अनेकदा नव्हता. कारण ते ‘रोटेशन’ पद्धतीने ठरवलं जातं. दरवर्षी तीस ते चाळीस टक्के राज्यांचे चित्ररथ येतात. यंदा तांत्रिकरित्या महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल रोटेशनमधून बाहेर पडले. बऱ्याच देशांचे प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहायला येत असतात, सगळ्या राज्याचे चित्ररथ कंटाळवाणे होऊ शकतात.’’ असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पिंपरी – चिंचवड भाजप शहराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर शहर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तत्पूर्वी पाटील पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा कोणताही प्रयत्न भाजप करणार नाही. निसर्गाप्रमाणेच राजकारणाचेही संतुलन बिघडले आहे, आम्ही प्रबळ विरोधी पक्ष म्हणूनच भाजप काम करु. खातेवाटपांवर ते म्हणाले, ‘‘मंत्रीमंडळ खातेवाटप झाल्याबाबत आनंद आहे. मंत्र्यांनी आता उत्तम काम करावीत. नागरिकांच्या अडचणी समजून मार्ग काढावा. विरोधासाठी विरोध करणारी माणसं आम्ही नाही. महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा कुठलाही प्रयत्न भाजप करणार नाही.’’ असेही पाटील यावेळी म्हणाले.