शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या, संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Sambhaji-Brigade.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
दोन दिवसांपासून राज्यात अतिवृष्टी सुरू आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तोंडाला आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतला आहे. आधीच कोरोना महामारिच्या मगरमिठ्ठीत सापडलेल्या शेतक-यांना आर्थिक संकटाने पुन्हा घेरले आहे. आता पीक नुकसानिचे पंचनामे करण्यात वेळ न घालवता शेतक-यांना हेक्टरी एक लाख रुपयांची सरसकट मदत देण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात काळे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे काढणीला आलेले पिके उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच ऊस, सोयाबीन, केळी, कांदा, कपाशी, फळबाग, यासह अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावात पावसाचे पाणी घरात जाऊन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात अनेक जनावरे देखील वाहून गेली आहेत. त्यामुळे आधीच कोरोणासारख्या महामारीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करुन पंचनामे करणे किंवा समिती नेमणे यामध्ये वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी काळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याच्याकडे केली आहे.