शास्तीकराचा प्रश्न नाही सोडविला तर पवारांची अवलाद सांगणार नाही – अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/IMG-20190922-WA0088.jpg)
पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी
- काळेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
- तिन्ही विधानसभांचे उमेदवार ठरल्याची केली घोषणा
विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तिन्ही मतदार संघातील उमेदवार निश्चीत झाले आहेत. परंतु, जे लोकसभेला घडले ते यावेळी होऊ देऊ नका, असा मार्गदर्शक सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी काळेवाडीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी आमदार आण्णा बनसोडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, चिंचवड, पिंपरी आणि भोसरी मतदार संघाचे उमेदवार ठरले आहेत. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी कोणी रुसायचे नाही. यावेळी एकजुटीने काम करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत झालेली चूक यावेळी होऊ देऊ नका. सत्ताधा-यांनी महापालिकेची अवस्था काय करून ठेवलीय. शास्तीकराचा प्रश्न सुटला नाही. आघाडीचे सरकार येऊ द्या, सहा महिन्यात हा प्रश्न नाही सोडविला तर पवारांची अवलाद सांगणार नाही.
उद्योग-धंदे बंद पडले आहेत. पाणी प्रश्न सुटला नाही. कचरा व्यवस्थापन हाताबाहेर गेले आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपले सरकार येणे गरजेचे आहे. आता घरातील कामे बाजुला ठेवा. सर्वांनी एकत्र येऊन मनापासून काम करा. राष्ट्रवादीच्या तिन्ही जागा जिंकून आणुयात, असा एल्गार पवार यांनी पुकारला.