शहरातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महापालिकेने सत्कार करावा
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १९ माध्यमिक विद्यालयांमध्ये व अनेक खाजगी विद्यालयांमध्ये गरीब कष्टकरी कुटुंबातील इयत्ता १० व १२ चे विद्यार्थी शिक्षण घेतात. दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आर्थिक स्वरूपात बक्षिस देऊन सत्कार करण्यात यावा, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंचचे अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केली आहे.
यासंदर्भात महापौर माई ढोरे यांना पत्र देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, मनपा शाळेतील इयत्ता दहावीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ८० % ते ८४.९९ % गुण असतील तर २५ हजार रुपये तसेच ८५ % ते ८९.९९% गुण असतील तर ५० हजार रुपये व ९० % ते १०० % गुण असतील तर १ लाख रुपये अर्थसहाय्य महापालिकेच्या वतीने दिले जाते.
तसेच, पिंपरी-चिंचवड खाजगी शाळेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीमध्ये ८० % ते ९०% गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये रक्कम बक्षीस म्हणून दिले जाते. आणि इयत्ता १० वीमध्ये ९०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून १५ हजार रुपये रक्कम दिली जाते. इयत्ता १२ वीमध्ये ८०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये रकमेचे बक्षिस दिले जाते.
इयत्ता दहावी व बारावीचा निकाल लागून बराच कालावधी उलटून गेला. परंतु, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यासंदर्भात महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन होत नसल्याचे दिसते. विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करून सत्कार होणे गरजेचे आहे. कारण, अनेक विद्यार्थी हे कष्टकरी, मजूर, झोपडपट्टी भागातील गरीब कुटुंबातील असतात. महापालिकेच्या बक्षिसरूपी रकमेतूनच त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सोयीस्कर होतो, असे साळवे यांनी पत्रात नमूद केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकने कोरोनाचे अथवा इतर कोणतेही कारण पुढे न करता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम रद्द करू नये. तात्काळ निधीची तरतूद करून महापालिकने सर्व नियमांचे पालन करून फिजिकल डिस्टन्स पाळून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा, अशी मागणी साळवे यांनी केली आहे.