लाडशाखीय वाणी समाजाला राजकीय संरक्षण हवे – धनंजय मुंडे
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या महा अधिवेशनास आल्यानंतर एक लक्षात आले आहे. या समाजाला आरक्षण नाही तर राजकीय संरक्षण हवे आहे. यापुढील काळात लाडशाखीय वाणी समाजाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्र्यांनी मागील साडेचार वर्षात महाराष्ट्रातील जनतेला अनेक आश्वासने दिली. परंतु,हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी पाठपुरावा करेल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जाहीर केले.
लाडशाखीय वाणी समाजाच्या वतीने पुणे (मारुंजी) येथे शनिवारी (दि. 24) दोन दिवसीय अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या सत्राचा समारोपप्रसंगी मुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, खा. राजू शेट्टी, अधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी,स्वागताध्यक्ष आर. एन. वाणी तसेच अनिल चितोडकर,निलेश पुरकर,राजेश कोठवडे,श्यामकांत शेंडे,राजेंद्र मालपुरे, विलास शिरोडे,कल्पेश भुसे,राजेंद्र पाचपुते आदींसह राज्यभरातून आलेले 40 हजारांहून जास्त समाज बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. जगदीश चिंचोरे,व्हा. ॲडमिरल सुनिल भोकरे,जयंत वाणी (ओएसडी,मंत्रालय),सुनील भामरे यांचा विशेष उल्लेखनिय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
मुंडे म्हणाले की, 28 वर्षांनंतर लाडशाखीय वाणी समाजाचे महा अधिवेशन होत आहे. याचा मनस्वी आनंद आहे. मराठी माणूस एकत्र येणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. तर एकी टिकवणे फार कठीण काम असून वाणी समाजाने हे आव्हान पेलत सर्वांना पुन्हा एकत्र बांधले याचे कौतुक वाटते. वाणी समाज काही मागण्यापेक्षा समाजाला काही देण्यासाठी पुढे असतो. त्यामुळेच हा समाज ज्या प्रदेशात,देशात जातो. तेथे एकरूप होऊन आपले कर्तव्य पार पाडत असतो. स्वतःचा विकास करतानाच इतरांना ही बरोबर घेऊन त्यांना अनेक उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात वाणी समाज अग्रेसर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाणी समाजाची संख्या अधिक आहे. या शहराच्या नव्हे तर देशाच्या जडण घडणीत समाजाचा मोठा वाटा आहे. पांडुरंग शास्त्री आठवले, प्रसाद महाराज, अंमळनेरचे महाराज, विचारदास महाराज यांचा अध्यात्माचा वारसा जपत, धार्मिक परंपरा जोपासत वाणी समाज प्रगल्भ होत गेला, असे मुंडे म्हणाले.