रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी आकुर्डीत आंदोलन; तहसील कार्यालयासमोर क्रांती रिक्षा सेनेकडून निदर्शने
पिंपरी |महाईन्यूज|
सात महिन्यांपासून रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळे चालकांचे हाल होत आहेत. मात्र, रिक्षाचालकांच्या विविध समस्यांकडे सरकारने दखल घेतली नाही. रिक्षाचालकांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आकुर्डीतील अप्पर तहसील कार्यालयात सोमवारी (दि.12) क्रांती रिक्षा सेनेकडून निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार गीता गायकवाड यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले.
आंदोलनास सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयासमोर सुरुवात झाली. ‘व्यवसाय पूर्ववत करावा’, ‘व्यवसायावरील सर्व निर्बंध हटवावे’, ‘कर्ज माफ करावे’, ‘आर्थिक पॅकेज जाहीर करावे’, ‘रिक्षाचा मुक्त परवाना बंद करावा’, ‘ओला, उबेरसारख्या खासगी कंपन्या बंद कराव्यात’, ‘सरकारने स्वतःची ऍप कंपनी सुरू करावी’, ‘सरकारने रिक्षाचालकांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी’, ‘रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे’, अशा विविध मागण्यांचे फलक रिक्षाचालकांनी हातात घेतले होते.
क्रांती रिक्षा सेनेचे अध्यक्ष श्रीधर काळे म्हणाले, “गेल्या महिन्यापासून क्रांती रिक्षा सेनेकडून अनेकदा लक्षवेधी निदर्शने केली आहेत, तरी सरकार रिक्षाचालकांच्या मागण्याचा विचार करत नाहीये. राज्य सरकारच्या अखत्यारीतील मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यास, तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मागण्यांचा पाठपुरावा करावा. अन्यथा आम्हाला मुलांबाळासह जेलभरो आंदोलन करावे लागेल.”
आंदोलनात संतोष निसर्गगंध, सतीश कदम, बाबासाहेब आखाडे, कविता मायनदल, रामा हेंडवळे, सिद्धार्थ शिरसाट, बाबासाहेब आखाडे, परमेश्वर तोडमल, दत्ता आभाळे, विश्वनाथ कुंभार, महेंद्र थेऊरकर, सुधाकर गुदडे, राजू महमूळकर, अल्ताफ रामपुरे, इब्राहिम पटेल, किमया खांडवीकर, सिद्धांत काळे, सुनील देठे, कैलास जोगदंड, सिद्धार्थ काळे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.