रावेत बंधा-यातील जलपर्णी तातडीने काढा, नगरसेवक मयूर कलाटे यांची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Mayur-kalate.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करण्यासाठी रावेत येथील बंधा-यातून पाणी उचलण्यात येते. या बंधा-यातील रावेत जलशुद्धीकरण प्रकल्पाभोवतालच्या परिसरात पाण्यामध्ये बेसुमार जलपर्णी वाढलेली आहे. तेथील पाणी अशुद्ध व दुर्गंधीयुक्त झाले आहे. या जलपर्णीमुळे संपूर्ण शहराच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बंधारा, नद्यांमधील जलपर्णी तातडीने काढण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केली.
याबाबत कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमधून वाहणा-या पवना, इंद्रायणी व मुठा नदींच्या पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली आहे. जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी निविदा काढली जाते. परंतु, ठेकेदार जुजबी काम करून जलपर्णी न काढता पावसाळ्याची वाट पाहतो.
पूरांच्या पाण्यामुळे जलपर्णी वाहून जाते आणि ठेकेदार काम न करता निविदेचे पैसे महापालिकेकडून घेतात. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. शहरातील नागरिकांना या जलपर्णीमुळे खूप त्रास होत आहे. जलपर्णीमुळे डांस, मच्छरांची पैदास होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच, साथीच्या रोगांचा फैलाव होत आहे. रावेत जलशुद्धीकरण प्रकल्पाभोवतालच्या परिसरातील तसेच शहरातून वाहणा-या नद्यांमधील जलपर्णी तातडीने काढण्यात यावी, अशी मागणी कलाटे यांनी निवेदनातून केली आहे.