‘रावणाऐवजी मोदींच्या पुतळ्याचे दहन’ सत्तर वर्षात प्रथमच घडले – डॉ. रत्नाकर महाजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/PHOTO-scaled.jpg)
- शेतकरी व कामगार कायद्याविरोधात कॉंग्रेसची स्वाक्षरी मोहिम सुरु
पिंपरी / महाईन्यूज
दुराचाराचे प्रतिक म्हणून उत्तर भारतात दस-याच्या दिवशी रावण दहन करतात. यावर्षी पहिल्यांदाच रावणाच्या पुतळ्याऐवजी उत्तर भारतात पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचे दहन केले. गेल्या सत्तर वर्षात जे कधी झाले नाही, ते आम्ही करुन दाखविले. असे जरा बीजेपीच्या तोंडून ऐकायला मिळाले तर बरे होईल, अशी खोचक टिका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डी येथे ‘किसान अधिकार दिनानिमित्त’ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ.महाजन बोलत होते. यावेळी कामगार व शेतकरी विरोधी काळे कायदे करणा-या केंद्र सरकारच्या विरोधात स्वाक्षरी मोहीमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पटेल यांच्या प्रतिमेस आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांच्या हस्ते स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, शाम अगरवाल, ज्येष्ठ नेत्या शामला सोनवणे, हरीदास नायर, राजेंद्रसिंह वालिया, ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, परशूराम गुंजाळ, सतिश भोसले, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष किशोर कळसकर, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, सुरेश लिंगायत, भाऊसाहेब मुगूटमल, मेहताब इनामदार, मयूर जयस्वाल, गौरव चौधरी, विशाल कसबे, मॅन्युअल डिसूजा, भास्कर नारखेडे, पांडूरंग जगताप, चंद्रशेखर जाधव, विठ्ठल कळसे, हिरामण खवळे, मकरध्वज यादव, अक्षय शहरकर, बाबा बनसोडे, सुनिल राऊत, प्रतिभा कांबळे, आशा शहाणे, रणजित तिवारी, ओंकार चिमीगावे, समाधान सोरटे, लक्ष्मण बोडरे, रवी एनपी, अनिकेत आरकडे, आशा काकडे, मोहिणी पाटील, वैराग भंगाळे आदी उपस्थित होते. भाजपा अनुसूचित जाती सेलचे शहर उपाध्यक्ष मोहन वाघमारे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
व्देष निर्माण करण्याचं काम संघाने केले – महाजन
डॉ. महाजन म्हणाले की, दस-याच्या दिवशी रावण म्हणून पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचे दहन करण्याची घटना सत्तर वर्षात प्रथमच घडली. याचा अर्थ असा की, गेल्या सहा वर्षात रंजली, गांजलेली जनता प्रत्यक्ष पंतप्रधानांना रावण म्हणून जाळू लागली आहे. लोकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, अनास्था, राग, संताप आणि असंतोषाचे हे प्रतिक आहे. केंद्र सरकारच्या विरोधातील जनतेच्या मनातील हि तीव्र प्रतीक्रिया स्वाक्षरी मोहिमेतून उमटणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1948 साली संघावर प्रथम बंदी घातली. संघासारखा देश विभाजनकारी गट या देशात हजर असल्यामुळे आणि कार्यरत असल्यामुळे आणि त्यांनी जे विशात्त वातावरण सबंध देशामध्ये निर्माण केले, त्याचा परिणाम म्हणजे महात्मा गांधींचा खून…! प्रत्यक्ष खून जरी सावरकरांच्या अनुयायांनी केलेला असला, तरी त्याला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचं आणि त्यांच्या बद्दल व्देष निर्माण करण्याचं काम संघाने केले. त्यामुळे संघाची सुध्दा ‘इक्वल रिस्पॉसिबिलीटी’ आहे. पंडीत नेहरु हे पक्के लोकशाहीवादी होते. त्यांचा या बंदीला विरोध होता. विचारांची लढाई विचारांनीच केली पाहिजे असे त्यांचे मत होते. तरीहि वल्लभभाई पटेल यांनी गृहमंत्री म्हणून संघावर बंदी घातली. पुढे वल्लभभाई पटेल आणि गोळवळकर यांच्यात झालेल्या वाटाघाटीनुसार पटेल यांनी ‘आम्ही कुठल्याही प्रकारे राजकारणात भाग घेणार नाही’ असे संघाकडून अंडरटेकिंग घेतले. परंतू, आज पंतप्रधान निवडण्यापासून सर्व गोष्टींमध्ये संघाचा हस्तक्षेप आहे.
भाजपतील तडीपार नेते कॉंग्रेसवर टिका करतात ?
भाजपात आयात झालेले नेते वगळता सर्वजण अगोदर संघाचे स्वयंसेवक आहेत, आणि मग भाजपाचे सदस्य आहेत. भाजपाची अवस्था उधार उसणवारीवर चाललेल्या संसारासारखी आहे. 2014 च्या निवडणूकीत भाजपाला एकूण मतांच्या 33 टक्के आणि 2019 च्या निवडणूकीत एकूण मतांच्या 36 टक्के मते मिळाली आहेत. आजही 64 टक्के लोक संघ परिवार, त्याचा विचार आणि बीजेपीच्या धोरणाविरोधात आहेत. तरीही 50 वर्षे सत्तेवर राहून अशी वल्गना त्यांचे ‘तडीपार नेते’ करतात अशी बोचरी टिका डॉ. महाजन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव न घेता केली. आणी बाणी बद्दल चूक झाल्याचे प्रामाणिकपणे मान्य करण्याचे धाडक स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले असल्याची नोंद प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे. परंतू 2002 सालच्या गुजरातच्या दंगली बद्दल एकही पश्चातापाचा शब्द अजूनपर्यंत कोणी काढलाय का? असा प्रश्न डॉ. महाजन यांनी उपस्थित केला. 2002 ला गुजरातच्या दंगली झाल्या त्यावेळी मुख्यमंत्री असणारा ‘तोच माणूस’ आज आपल्याला धर्माचे, देशभक्तीचे, देशाच्या सुरक्षिततेचे, नैतिकतेचे, विश्वगुरु व्हायचे धडे देत आहे हि शोकांतिका आहे असेही डॉ. महाजन म्हणाले.
हे कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत देशभर सत्याग्रह – साठे
सचिन साठे म्हणाले, कृषी प्रधान देशातच बळीराजाला हक्क डावलून भांडवलदारांच्या दावणीला जुंपण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. दोन कोटी रोजगार दरवर्षी देऊ म्हणणा-या हे केंद्र सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत कबूली दिली की, देशातील 6,83,000 कंपन्या आता पर्यंत बंद पडल्या आहेत. त्यापैकी 1,42,000 कंपन्या महाराष्ट्रातील आहेत. यामुळे कोट्यावधी लोकांचा रोजगार बंद झाला. केंद्र सरकार शेतकरी व कामगार विरोधी हे जुलमी कायदे जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत कॉंग्रेस पक्ष देशभर सत्याग्रह आंदोलन सुरु ठेवणार आहे. तसेच या स्वाक्षरी मोहिमे अंतर्गत शहरातून 1 लाख सह्यांचे निवेदन कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे देणार आहोत.