युतीशिवाय लोकसभा निवडणुकीत भाजपचे 40 खासदार निवडून येतील – रावसाहेब दानवे
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आपल्या देशात दररोज एक आघाडी तयार होत आहे. अशा कितीही आघाड्या झाल्या तर भाजपवर परिणाम पडणार नाही. शिवसेना-भाजप युती नाही झाली तरी स्वबळावर लोकसभेच्या 40 जागा भाजपच्या निवडूण येतील, असा आत्मविश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत आज गुरूवारी (दि. 17) व्यक्त केला.
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिका-यांच्या कामाचा दानवे आढावा घेत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज गुरुवारी ते पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. आढावा बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन ही माहिती सांगितली. यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, योगेश टिळेकर, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सभागृह नेते एकनाथ पवार, प्रदेश पदाधिकारी उमा खापरे, महिला अध्यक्षा शैला मोळक, राजेश पिल्ले उपस्थित होते.
दानवे म्हणाले की, राज्य सरकारचा कालावधी आणखी वर्षभर राहिला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हाही होऊ शकतो. त्यात पिंपरी- चिंचवड शहरातील आमदारांना स्थान देण्याबाबत नक्कीच विचार केला जाईल. उत्तर प्रदेश अथवा अन्य राज्यात तेथील घटक पक्षांची युती झाली असली तरी आपल्या देशामध्ये दररोज युत्या होत आहेत. त्याचा भाजपवर कसलाही परिणाम पडणार नाही. भाजप-शिवसेना युती नाही झाली तर स्वबळावर लोकसभेच्या 40 जागा भाजप निवडून आणेल. त्यामुळे युती झाली तरच पक्षाच्या जागा लागतील अथवा नाही, हा गैरसमज सोडून द्यावा, असेही दानवे यावेळी म्हणाले.
विरोधकांनी काऊंटडाऊनचे फ्लेक्स दहा वर्ष लावावेत
नागरिकांचे प्रश्न कधी संपत नसतात. एक संपला की दुसरा प्रश्न निर्माण होतो. शहरातील प्रलंबित प्रश्न राज्य सरकार आणि महापालिका मिळून सोडवतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 15 दिवसांत शास्त्रीकर माफ करू, या घोषणेचे विरोधकांनी फलक लावून काउंटडाऊन सुरु केल्याबाबत विचारले असता विरोधकांना आणखीन दहा वर्ष फलक लावावे लावणार आहेत, अशी टिका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.