मुदत संपली तरीही बिजलीनगर – गुरुद्वारा चौक अंडरपासचे काम अर्धवट
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
बिजलीनगर ते गुरूद्वारा चौक अंडरपासचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेले आहे. या प्रभागात सत्ताधारी भाजपचे नगरसेवक असताना या कामाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांचे, प्रवाशांचे हाल होत असून हा अंडरपास तातडीने पूर्ण करण्यात यावा, अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसने दिला आहे.
यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल यांनी ब प्रभाग अधिकारी प्रशांत जोशी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी सेवादल अध्यक्ष मकरधवज यादव, युवक काँग्रेसचे विशाल कसबे, स्वप्नील शिंदे उपस्थित होते. निवेदनात जयस्वाल यांनी म्हटले आहे की, 2018 पासून प्रभाग क्र.20 येथील बिजलीनगर ते गुरुद्वारा चौक अंडरपासचे काम सुरू आहे. आद्यप ते अर्धवट स्थितीत आहे. स्थायी समितीच्या आदेशानुसार काम पुर्ण करण्याची काल मर्यादा मार्च 2020 होती. परंतु, हे काम अद्याप 50% देखील पूर्ण झालेले नाही. गेली दोन वर्षे निगडी-प्राधिकरण- रावेतला जोडणारा मुख्य रस्ता या कामानिमित्त वाहतूकीसाठी बंद आहे. नागरिकांना पर्यायी म्हणून गल्लीबोळातुन वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. वाद विवाद निर्माण होतात.
हा मुख्य रास्ता बंद असल्याने पीएमपीएल बससेवा बंद असून कामगारांच्या कंपनी बससेवा, मुलांची शाळेची बससेवा या मार्गावर बंद आहेत. तसेच, या रस्त्यालगत असणारे छोटे-मोठे दुकानदार व व्यापारी यांचे व्यवसाय पूर्णपणे बंद पडले आहेत. करदात्यांचे करोडो रुपये खर्च करून या अंडरपास (सबवे)ची गरज काय ? असा सवाल नागरिक विचारत आहेत. संथगतीने चालणाऱ्या या कामाच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. अंडरपासचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अन्याथा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल यांनी दिला आहे.