मावळातील गडकिल्ल्यांची जागतिक वारसा हक्कात नोंद करणार – छत्रपती संभाजीराजे
लोणावळा – मावळ तालुक्यातील गड किल्ल्यांची जागतिक वारसा हक्कात नोंद व्हावी याकरिता भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याची आश्वासन गड किल्ले संवर्धनाचे ब्रँड अॅम्बेसिडर खासदार संभाजीराजे यांनी मावळवासीयांना दिले. मावळा भागातील गड किल्ले व लेण्या यांची नोंद युनेस्कोच्या यादीत व्हावी याकरिता संपर्क संस्थेच्या वतीने भाजे लेणी ते लोहगड किल्ला दरम्यान आज आयोजित केलेल्या संपर्क हेरिटेज वाॅकच्या उद्घाटन प्रसंगी खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.
यावेळी मावळचे आमदार बाळा भेगडे, दाभाडे घरण्याचे वंशज सत्येंद्रराजे दाभाडे, भारतीय पुरातत्त्व विभागाचे उपअधिक्षक नेगी, पंचायत समिती सभापती गुलाब म्हाळसकर, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापु भेगडे, अभिनेत्री गिरिजा ओक, संपर्क बालग्राम संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, आयएनएस शिवाजीचे कमांडर श्रीनिवासन, सिअारपीएफचे डीआयजी सचिन गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, भाजे गावचे सरपंच चेतन मानकर, दीपक हुलावळे, शरद हुलावळे, बाळासाहेब भानुसघरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 पेक्षा अधिक गड किल्ल्यांपैकी एकाही किल्ल्याची नोंद आजपर्यत जागतिक वारसा हक्कात नाही हे आपले दुदैव अाहे. महाराष्ट्रातील कोणत्याही राजकारण्यांना गड किल्ले संवर्धनाच्या कामात रस नाही. राजस्थान मधील ज्या किल्ल्यांना कोणताही इतिहास नाही त्याठिकाणी कधी लढाई देखिल झाली नाही असे सात किल्ले जागतिक वारसा हक्कात नोंद आहेत पण महाराजांचा एकही किल्ला नाही. महाराजांच्या सर्व गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी वेगळी मिनिस्ट्री स्थापन करण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. सरकारं करोडो रुपये हिकडे तिकडे खर्च करतात मंग गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष का असा प्रश्न देखिल त्यांनी यावेळी उपस्थित केला.