महापालिका, भाजी मंडई गाळ्यांचे नुतनीकरण करा – माजी खा. गजानन बाबर
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व भाजी मंडईच्या गाळ्यांचे नुतनीकरण केले नाही. महापालिका अधिकारी या मध्ये हलगर्जीपणा करत आहेत. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे गाळ्यांचे त्वरित नुतनीकरण करून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देऊन हि मागणी केली.
निवेदनात नमूद केले आहे की, महापालीकेचे 145 गाळे आणि भाजीमंडईचे 1 हजार 224 गाळे यांचा करार संपलेला आहे. भूमी आणि जिंदगी विभागाने अद्यापपर्यंत त्याचे नूतनीकरण केलेले नाही. या मिळकती अजूनही भाडेकरू वापरत आहेत. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या व्यापारी गाळ्यांची संख्या महापालिका वापर -153 ,लिजने -340, भाड्याने -145, शिल्लक गाळे – 282, भाजी मंडई भाड्याने -1224 आहेत. तसेच मोकळ्या दोन जागा भाड्याने देण्यासाठी सध्या निविदा प्रसिद्ध केली आहे. महापालिकेने शासकीय कार्यालयासाठी भाड्याने दिलेल्या इमारती- 69 आहेत. त्यात पीएमपीएलसाठी 6 जागा, मेट्रोला 10 जागा देण्यात आल्या आहेत. महापालिकेने वेळेवर भाड्याने दिलेल्या जागेचा करार तसेच नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
परंतु, माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या आजमितीला 145 गाळे आणि 1224 भाजीमंडई गाळे यांचा करार संपलेला आहे. नूतनीकरण झालेले नाही. तसेच या मिळकती अजूनही भाडेकरू वापरत आहेत. यावर प्रशासनाचे कोणतेही लक्ष नाही. यामुळे महापालिकेचे तसेच त्यांच्या मिळणारा महसूल पण बुडत आहे. याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. स्वतंत्र भूमी आणि जिंदगी विभाग असताना या विभागामार्फत नूतनीकरण किंवा करार होत नाही. या मध्ये भ्रष्टाचार होत नाही ना, हेही तपासले पाहिजे. तसेच याची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही बाबर यांनी केली आहे.