breaking-newsपिंपरी / चिंचवड
मराठा आरक्षण, पालकांनो शैक्षणिक संस्थाकडून अडवणूक झाल्यास संभाजी बिग्रेडकडे संपर्क करा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/20190803_182711.jpg)
– संभाजी बिग्रेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांचे आवाहन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मराठा समाजाला आरक्षण मिळूनही अनेक नामाकिंत संस्था प्रवेश प्रक्रियेसह शैक्षणिक फी भरण्यास विद्यार्थ्यांची अडवणूक करु लागले आहेत. तसेच संपुर्ण शैक्षणिक फी भरण्यास तगादा लावत आहेत. त्यामुळे पालकांनो, प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक फी भरण्यास अडचण आल्यास संभाजी बिग्रेडशी संपर्क करावा, असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी महा ई न्यूज शी बोलताना केली. तसेच मराठा समाजाच्या अडीअडचणी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्यासमोर मांडल्या असून त्यावर मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्याशी बोलून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासनही त्यांना दिले आहे.
पवार म्हणाले की, उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देऊनही राज्य सरकारने शाळा कॉलेजला त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिलेला नाही. त्यामुळे संपूर्ण फी भरल्याशिवाय मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेचा फ़ॉर्म भरून द्या. ती शिष्यवृत्ती सरकार कडून जमा झाल्यानंतर तुम्हाला पैसे परत मिळतील, अशी उत्तरे सर्रासपणे संस्थाचालक विद्यार्थ्यांना देत आहे. त्यात प्रवेशाची वेळ संपत आली असल्यामुळे अनेक पालक नाईलाजास्तव कर्ज काढून आपल्या पाल्याची फी भरत आहेत.
त्यामुळे आम्हाला नक्की आरक्षण मिळाले आहे का? की आमची फसवणूक केली जात आहे. हेच कळायला मार्ग नाही. खरंच आमच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा असेल, तर ज्या संस्था मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करत आहेत. त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात पुन्हा तीव्र आंदोलन उभे करेल. याशिवाय याबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना विषयाचे गांभीर्य आणि विद्यार्थ्यांची अडचण समजावून सांगितलेली. हा विषय खासदार संभाजीराजे मुख्यमंत्र्याशी तात्काळ बोलून हा विषय सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.