‘भाजी विक्रेता ते आयएएस अधिकारी’, अशी आहे आयुक्त राजेश पाटील यांची संघर्षकथा
- कौटुंबिक मर्यादा आणि अडथळ्यांचे प्रचंड आव्हान
- गावातील वर्गमित्रांनी दिले त्यांच्या जिद्दी पंखांना बळ
पिंपरी / महाईन्यूज
यूपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या परराज्यातील अनेक अधिका-यांच्या संघर्षकथा आपल्याला ऐकायला मिळल्या आहेत. परंतु, महाराष्ट्राच्या मातीतही हालाकीच्या परिस्थितीवर जिद्दीने मात करून यूपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या अधिका-यांचा संघर्ष आपले लक्ष केंद्रीत करतो. असा प्रवास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांचा ही झालेला आहे.
राजेश पाटील यांनी 2005 मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं शिक्षणावर खर्च करणं अशक्य होतं. त्यातच पटकन नोकरी मिळवून घरातील आर्थिक जबाबदारी उचलण्याचीही गरज होती. पण, या सगळ्यावर मात करत राजेश पाटील हे आयएएस अधिकारी झाले. त्यांची पथम नियुक्ती झाल्यानंतर ओडिशातील आपत्तीच्या काळात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते.
राजेश पाटील आपल्या शिक्षणाचा खर्च काढण्यासाठी शेतात मजुरी करायचे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं त्यांना कमी वयात खूप काम करावं लागलं. अनेकदा भाजी आणि ब्रेड विकून त्यांनी शिक्षणासाठी पैसा उभा केला. अतिशय बेताची परिस्थिती असलेल्या कुटुंबात राजेश जन्माला आले. त्यांचे वडील शेतीवर कुटुंबाची गुजरान करायचे. त्यातून कसाबसा कुटुंब चालविण्यासाठीचा खर्च निघायचा. त्यामुळे कमी वयातच राजेश यांनी वडिलांना मदत करायला सुरुवात केली.
त्यांच्या गावामध्ये शिक्षणाची वानवा होती. गावातील पालक नेहमीच आपल्या मुलांच्या भविष्याविषयी काळजीत असायचे. पण, गावातील शिक्षक आणि मित्र राजेश यांच्या मदतीला धावून आले. शिक्षक आणि मित्रांनी राजेश यांना अभ्यास करायला प्रोत्साहन दिले. दहावी आणि त्यानंतर बारावीचं शिक्षण झालं. पण, त्यावेळी आर्थिक स्थिती इतकी नाजूक होती की, ग्रॅज्युएशनची फी द्यायलाही राजेश यांच्याकडे पैसे नव्हते. शिक्षण अर्ध्यावर सुटू नये म्हणून, राजेश शेतात मजुरी करायचे.
पुरस्कार आणि पुस्तकही लोकप्रिय
स्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये राजेश यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयएएस अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. २००५ मध्ये ते यूपीएससी पास झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली. ओडिशामध्ये काम करताना २००८ मध्ये महानदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. राजेश यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राजेश यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले असून, ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे त्यांचे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.