भाजपात गेलो असतो तर आमदार झालो असतो; पण जानवे घालावे लागले असते- माजी आमदार विलास लांडे
- कै. अंकुशराव लांडगे सभागृहात गौरव सोहळा
पिंपरी। पंतप्रधान मोदी लाटेचा विचार करुन भाजपात प्रवेश केला असता, तर गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार झालो असतो. त्यासाठी मला गळ्यात जानवे घालावे लागले असते. पण, मी गळ्यात जानवे घातले नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा निष्ठवान म्हणून आजपर्यंत राजकीय वाटचाल करीत आहे. यापुढेही राष्ट्रवादीसोबत काम करीत राहीन, अशा भावना माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केल्या.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात माजी आमदार विलास लांडे यांचा वाढदिवसानिमित्त गौरव सोहळा आयोजित केला आहे. यावेळी लांडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर हनुमंत भोसले, वैशाली घोडेकर, मोहिनी लांडे, तसेच वसंत लोंढे, नगरसेवक संजय वाबळे, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.
जगताप आणि माझे तीन पिढ्यांचे संबंध
भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि माझे तीन पिढ्यांचे संबंध आहेत. राजकारणात कोण- कुणाचाही शत्रू नसतो. आमच्या सौभाग्यवती नंतर पहिल्यांदा मी माझ्या मित्राशी चर्चा करतो. आम्ही नात्याच्या पलिकडे मैत्री जपली आहे. हा कार्यक्रम पक्षाचा नाही. त्यामुळे जगताप याठिकाणी कसे? हा प्रश्न उपस्थित होण्याचा प्रश्नच नाही. आम्ही कायम एकमेकांच्या सुख:दुखात सहभागी झालो, असेही विलास लांडे यांनी म्हटले आहे.