भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना त्रास ; महासभेत ‘त्या’वर चर्चा कमी अन्ं वैयक्तीक वादावरुन राडा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/palika-sabha.jpg)
सत्ताधारी भाजप आणि विरोधी राष्ट्रवादीचे नगरसेवक एकाच माळेचे मणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्वान आंदोलनावरुन आज (बुधवारी) सत्ताधारी भाजप आणि विरोधी राष्ट्रवादीत ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये चांगलीच शाब्दीक चिखलफेक झाली. श्वानाची पिल्ले आणल्यावरून विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि भाजपच्या माजी स्थायी अध्यक्षा सीमा सावळे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. भटक्या श्वानांच्या त्रासाचा विषय सोडून ते दोघे व्यक्तीगत पातळीवर घसरल्याने वाद उफाळून आला. परिणामी सत्ताधारी भाजपने भटक्या श्वानावर चर्चा न करता महासभा 27 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. या महासभेचे महापाैर राहूल जाधव हे अध्यक्षस्थानी होते.
पिंपरी चिंचवड शहरात भटक्या श्वान व वराहांचा उपद्रव वाढला आहे. महापालिका पशुवैद्यकीय विभाग यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वसाधारण सभेत श्वान सोडण्याचे आंदोलन करण्याचे नियोजन केले. परंतु, सुरक्षारक्षकांनी अडविल्याने आणि सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी उपायोजनांचे आश्वासन दिले. त्यामुळे श्वान सभागृह आणले नाही. मात्र, सभा सुरू होता सीमा सावळे यांनी राष्ट्रवादीने चुकीच्या पध्दतीने आंदोलन केले आहे. त्यांच्या स्टंटबाजीसाठी त्या श्वानांचा जीव जावू शकतो. हा आरोप करत राष्ट्रवादीविरुध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
याच विषयावरून चर्चा करताना भाऊसाहेब भोईर, विनया तापकीर, राहूल कलाटे, संदीप वाघेरे, नीता पाडाळे यांनी या प्रश्नावरून पशुवैद्यकीय विभाग रडारवर घेतले. मात्र, सावळे यांच्याप्रमाणे उषा मुंढे, आशा शेंडगे यांनी या प्रश्नासाठी राष्ट्रवादी चुकीच्या पध्दतीने आंदोलन करून स्टंट करीत असल्याची भूमिका मांडली. त्यानंतर दत्ता साने यांनी बोलायला सुरुवातच सीमा सावळे ह्या मध्येच बोलण्यावरून वाद वाढला. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक तु-तु, मै-मै करीत खटके उडाल्याने हा वाद आणखी वाढला. त्यामुळे महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. पुन्हा कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी व भाजप नगरसेवकांनी महापौरांपुढे जाऊन गोंधळ सुरू केला. त्यातच साने यांनी भाषणात ९६ कुळी शेतकरी असा शब्द वापरल्याने तो वगळून सभा तहकूब करण्याचा ठराव सभागृह नेते एकनाथ पवार यांनी मांडला. तसे करण्याचे निर्देश देत महापौर जाधव यांनी २७ तारखेपर्यंत सभा तहकुबीची घोषणा केली.
दरम्यान, भाजपचे नगरसेवक बाबा त्रिभुवन, विकास डोळस, लक्ष्मण उंडे यांनीही राष्ट्रवादीचा निषेध व्यक्त केला. परंतू, शहरात भटक्या श्वानांसह वराहचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील अस्वच्छतेमुळे साथीचे आजार वाढू लागले आहेत. स्वाईन फ्लूनेही तब्बल 20 जणांचा बळी गेला आहे. त्यातच अनेक लहान मुले, अबाल वृध्द नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यावर रेबीज लसही उपलब्ध होत नाही. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांना नागरिकांच्या प्रश्नापेक्षा राष्ट्रवादीचे आंदोलन कसे चुकीचे आहे. त्यावर बोलण्यात अधिक उत्सुकता दिसत होती. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला जनतेच्या प्रश्नाचा विसर पडू लागल्याचे दिसू लागले आहे.