बांधकाम कामगार हक्कासाठी राज्यव्यापी लढा उभारणार
बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या मुंबईतील कार्यशाळेत निर्धार
पिंपरी ( महा ई न्यूज ) – बांधकाम कामगारांचा कायदा झाला, पण त्या कायद्याची अंमलबजावणी राज्यातील काही जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात झालेली नाही. त्यामुळे अनेक कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, कामगार कल्याण मंडळाकड़े नोंदणी होत नसून विविध योजनांचा लाभही मिळत नाही, या कायद्याच्या अमंलबजावणीसाठी राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्धार मुंबईतील कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला.
मुंबई येथील रविंद्र नाट्य मंदिरात बांधकाम कामगार संघटना कृती समिती महाराष्ट्र राज्यतर्फे राज्यस्तरीय कामगार प्रतिनिधींची एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
यावेळी कॉम्रेड शंकर पुजारी, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, सांगलीचे उदय बचाटे, मुंबईचे एकनाथ माने, औरंगाबादचे मधुकर खिलारे, सिंधुदुर्गचे संतोष देगी, नवी मुंबईचे उदय चौधरी, अमरावतीचे पियूष शिंदे, पुण्याचे उमेश डोर्ले, साईनाथ खंदिझोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत महाराष्ट्रात सर्व प्रथम मे २०११ रोजी बांधकाम कामगार मंडळ स्थापन झाले. त्यानंतर मोठा गाजा-वाजा झाला. प्रत्यक्षात कामगारांना नोंदणी ओळखपत्र, इतर लाभ खुप कमी प्रमाणात मिळाले, परंतू, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी केलेल्या अांदोलनामुळे सरकारने पुढे कामगारांची व्यापक नोंदणी करण्याचे आदेश दिले, त्यापुढेही समाधानकारक कामकाज झाले नाही. कामगारांना सुरक्षा साधनाची सक्ती असताना ते न देता, या साधनाशिवाय काम करावे लागत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. अनेकवेळा मृत्यु होवून त्या कामगार कुटूंबियाना न्याय मिळत नाही.
याबाबत राज्यातील विविध जिल्ह्यात वेगवेगळी परस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे कामगार कायद्याच्या सर्वत्र योग्य अमंलबजावणीसाठी संयुक्तपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी सर्वानुमते करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक आदेश बनसोडे यांनी केले. तर पियूष शिंदे यानी आभार मानले.