पुणे, पिंपरीत ६४ हजार शिधापत्रिका निलंबित
पुणे – ज्या शिधापत्रिकाधारकाने सलग तीन महिने धान्य खरेदी केलेली नाही त्यांची शिधापत्रिका निलंबित केली जाणार आहे. आत्तापर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 64 हजार शिधापत्रिका निलंबित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्न पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली.
राज्यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत होता. ते रोखण्यासाठी पुरवठा विभागाने राज्यात सर्वत्र इ-पॉस आणि शिधापत्रिकांना आधार क्रमांकांशी सलग्न केले आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, ज्या शिधापत्रिकाधारकांनी सलग तीन महिने राज्यात कुठेच धान्य घेतलेले नसलल्याचे आढळून आल्यास तो लाभार्थी अस्तित्वात नाही, किंवा तो स्थलांतरित झाला आहे, असे समजून ती शिधापत्रिका निलंबित केली जात आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील 11 परिमंडलात अशा 64 हजार शिधापत्रिका निलंबित करण्यात आल्या आहेत. निलंबित शिधापत्रिकाधारकांना त्यानंतर धान्य घ्यायचे असल्यास तीन महिने धान्य का घेतले नाही, याचे स्पष्टीकरण लेखी स्वरूपात द्यावे लागणार आहे, असे मोरे यांनी सांगितले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अन्न सुरक्षा योजनेचे 2 लाख 61 हजार 760 कुटुंब लाभार्थी असून, अंत्योदय योजनेचे लाभ होणार्या कुटुंबांची संख्या 8 हजार 800 एवढी आहे. वितरण प्रणाली ऑनलाइन केल्यापासून अन्नसुरक्षा आणि अंत्योदय अन्न योजनेतून गहू 1 हजार 885 व तांदूळ 1 हजार 272 मेट्रिक टन धान्य बचत झाले आहे, असा दावा मोरे यांनी केला आहे.
सध्या अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आत्तापर्यंत सुमारे तीन हजार अर्ज प्राप्त झाले असून, त्याची छाननी सुरू आहे. अर्ज करण्यासाठी शहरीभागातील कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 59 हजार रुपये असणार्या कुटुंबांना शिधापत्रिकेची झेरॉक्स, कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्डची झेरॉक्स, कुटुंब प्रमुखांचा फोटो आवश्यक आहे.