पिंपरी-चिंचवडमधून शरद पवारांना 10 लाखवेळा ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्र पाठविण्याचा संकल्प
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
अयोध्येत भव्य राम मंदिर भूमिपूजनाची तारीख जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ”मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येणार आहे का ?”, असा प्रश्न उपस्थित केला. याच्या निषेधार्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी 10 लाख वेळा ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्र पाठविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
राम मंदिर बांधण्यासाठी सरकारने तारिख जाहीर केली. परंतु, सध्या देशावर आणि राज्यावर कोरोनाचे जीवघेणे संकट असताना ”मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येणार आहे का ?”, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. पवार यांच्या या वक्तव्याचा भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला. जय श्रीरामाचे स्मरण होण्यासाठी त्यांना 10 लाखवेळा जय श्रीराम लिहिलेली पत्र पाठविण्याचा संकल्प पिंपरी-चिंचवड भाजयुमोच्या पदाधिका-यांनी केला आहे. भाजयुमो पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या अध्यक्षतेखाली आज २० हजारवेळा “जय श्रीराम” लिहीलेली पत्र पोस्ट करण्यात आली.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रथम नागरिक महापौर माई ढोरे, भाजयुमो प्रदेश चिटणीस अनुप मोरे, प्रदेश सदस्य जवाहर ढोरे, प्रभाग स्विकृत सदस्य दिनेश यादव, भाजयुमोचे भूषण गायके, साई कोंढरे, सुमित घाटे, राजेश राजपुरोहित, शिवराज लांडगे, उदय गायकवाड, प्रकाश चौधरी, पूजा आल्हाट, अभिजित बागुल आदी पदाधिकारी उपस्थित होते.