पिंपरीच्या महापौरांनी उद्घाटन केल्यानंतर 24 तासात उड्डाणपूल बंद
पिंपरी |महाईन्यूज|
‘पीसीएनटीडी’तर्फे औंध ते काळेवाडी हा साई चौक येथे उभारण्यात आलेल्या पुलाचे महापौर उषा ढोरे यांनी सोमवारी घाईघाईत लोकार्पण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, पुलाचे काम अर्धवट असल्याचे सांगून ‘पीसीएनटीडी’ने मातीचा ढिगारा टाकून हा पूल पुन्हा बंद केला आहे. दरम्यान, प्राधिकरण प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ श्रेय घेण्यासाठी महापौरांनी पुलाचे उद्घाटन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला होता.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून औंध ते काळेवाडी रस्त्यावर पुण्यातून काळेवाडी, डांगे चौकाकडे जाणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, पुलाचे काम पूर्ण झाल्याचे सांगून भाजपने मंगळवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला होता. महापौर ढोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले. साई चौक येथे हा पूल उभारण्यात आला आहे. ७०० मीटर लांब आणि आठ मीटर रुंदी असलेल्या या पुलाचे काम अद्याप बाकी असल्याचे सांगून प्राधिकरण प्रशासनाने मंगळवारी पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचे ढिगारे टाकून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला.
पुलाचे काम अद्याप बाकी आहे. राडारोडा तसेच पुलावरील खड्डे बुजविलेले नाहीत. पुलावरील वायरिंग उघड्यावरच आहे. अशा परिस्थितीमध्ये घाईघाईने उद्घाटन करून पूल वाहतुकीस खुला केला होता. यामध्ये एखाद्या दुचाकीस्वाराचा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? केवळ श्रेय घेण्यासाठी हा सर्व घाट घालण्यात आला होता.
- नाना काटे, विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका