पाणी पुरवठा योजनेसाठीच्या खोदाईवरून आयुक्तांवर नगरसेवकांचा संताप
- स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांना विचारला जाब
- खोदाई पूर्ण करण्यासाठी दिली पंधरा दिवसांची मुदत
पिंपरी – केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत राबविण्यात येणा-या 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी निगडी प्राधिकरणात केलेल्या रस्ते खोदाईमुळे पालिकेची अन्य विकास कामे रेंगाळली आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहे. खोदाईमुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. भर पावसाळ्यात रस्ते खोदाईस परवानगी कशी दिली जाते? असा प्रश्न उपस्थित करत राजू मिसाळ आणि अमित गावडे यांनी आयुक्तांना धारेवर धरले.
महापालिका स्थायी समितीची बैठक सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 6) पार पडली. बैठकीत प्राधिकरणातील रस्ते खोदाईचा विषय चांगलाच गाजला. नगरसेवक अमित गावडे म्हणाले की, शहराच्या विविध भागात 24 तास पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी रस्त्यांची खोदाई केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी खोदाईचे काम पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु, तसे होताना दिसत नाही. गेल्या पाच दिवसात प्राधिकरणात आठ अपघात झाले आहेत. यामध्ये दुर्देवाने एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी पालिका घेणार का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राजू मिसाळ म्हणाले की, 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे. तीन महिन्यापूर्वी खोदाई करून ठेवली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात खड्डे बुजले आहेत. पावसाळ्यात हे काम होणे अपेक्षीत नाही. तरीही, महापालिकेने ठेकेदाराला खोदाईसाठी पावसाळ्यातही स्पेशल मान्यता दिली आहे. परंतु, या खोदाईमुळे पालिकेच्या अन्य कामांना खीळ बसली आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खुलासा करताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, अमृत योजनेअंतर्गत 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. विशेष योजनेचे काम असल्यामुळे खोदाईस परवानगी देण्यात आली आहे. 15 दिवसांत काम पूर्ण करण्यात येईल. हे काम पंधरा दिवसांत पूर्ण न झाल्यास खोदाई बंद केली जाईल.