पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ, आपत्तीनिवारण कक्ष सज्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराची जीवयदायिनी असलेल्या पवना धरणाच्या परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून साडेचार हजार क्सुसेक पाणी सोडले आहे. त्यामुळे पवना नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाची तातडीची बैेठक झाली. प्रशासनाने सर्व प्रभाग आणि अधिकाऱ्यांना दक्षता घेण्याची सूचना केल्या आहे.
पिंपरी-चिंचवड आणि मावळ भागात पावसाचा जोर कायम आहे. पवना धरण परिसरातही पाऊस वाढला आहे.पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून दररोज पाण्याचा विसर्ग वाढत आहे. सुमारे साडेचार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह नेहमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमधील नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. आपत्तकालीन परिस्थिती ओढावू नये यासाठी महानगरपालिकेच्या वतीने या संदभार्तील बैठक घेतली. सर्व संबधित विभागांना यंत्रणा सुसज्ज ठेवण्याबाबत सुचना केल्या आहे. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष तसेच क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पूरनियंत्रण कक्ष सुरू केला असून नागरिकांनी या केंद्राशी संपर्क साधावा. स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, आरोग्य, अग्निशमन अशा सर्वच विभागांना सूचना दिल्या आहेत.
बैठकीस शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता अय्युबखान पठाण, शिक्षण समिती प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, आशा राऊत, विजय खोराटे, श्रीनिवासदांगट, मनोज लोणकर, मंगेश चितळे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, संदेश चव्हाण, दिपक सुपेकर, देवन्ना गटटूवार, संजय भोसले, शशिकांत मोरे, प्रविण घोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, वायरलेस इन्चार्ज थॉमस नरोना, आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी उपस्थित होते.