पवना धरणातून पाण्याचा विसर्ग, नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा
![227 mm rainfall in the last 24 hours in Pavana Dam area, 66.75 per cent water storage](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/pavana-dam.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – पवना धरणाच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून पुढील काही दिवसांत धरणाच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. उपलब्ध 92 टक्के पाणीसाठा पाहता उर्वरीत पर्जन्यवृष्टीचा अंदाज पाहून धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना व गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या आठ दिवसांत पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. धरण क्षेत्रात तर अपेक्षेनुसार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाण्यात झपाट्याने वाढ होत आहे. आजअखेर 92 टक्के साठा उपलब्ध आहे. धरणाच्या पश्चिम भागातील खो-यात पावसाचा जोर कायम आहे. ढगांचा कडकडाट आणि वादळ वा-यांसह पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पाणी साठा वाढण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणी साठा आणि पर्जन्यवृष्टीचा विचार करता पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे, अशी तयारी पाठबंधारे विभागाच्या अधिका-यांनी ठेवली आहे.
धरणातून पाणी सोडल्यास पवना नदीपात्रात पातळी वाढणार आहे. त्यामुळे नदीलगतच्या खेडे गावांना, तेथील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला देखील आपल्या यंत्रणेसह दक्ष राहण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देले आहेत.