पर्यावरण विभागप्रमुखाच्या गलथान कारभारामुळे पवना नदीपात्रात माशांचा मृत्यू
पिंपरी / महाईन्यूज
रावेत येथील पवना नदीत पात्रात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्यामुळे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर महापालिकेतील पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना चांगलाच जाब विचारला. नदीपात्रात केमिकल मिश्रीत पाणी सोडले जात असल्यामुळे याला कोण जबाबदार आहे ? असा प्रश्न उपस्थित करत कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्याची तंबी महापौरांनी प्रशासनाला दिली.
रावेत बंधारा येथून उपसा केलेले पाणी प्रक्रीया करुन नागरिकांना पिण्यासाठी वापरले जाते. मात्र, कंपन्यांमधून केमिकल मिश्रित पाणी सोडले जात असल्यामुळे नदीतील जलचरांच्या जीवाला हानी होत आहे. पर्यायाने नागरिकांच्या जीवालाही मोठा धोका आहे. दरम्यान, आज रावेत येथे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत मासे आढळून आले. माजी नगरसेवक गणेश भोंडवे यांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर महापौरांनी या भागाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. पालिकेतही पर्यावरण अभियंत्यांची महापौरांनी चांगलीच कानउघडणी केली.
विकासनगर परिसरात शेकडो लहान मोठे उद्योग आहेत. या उद्योगांमधून दररोज लाखो लिटर रसायनयुक्त पाणी प्रक्रिया न करता पवना नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीतील जीवसृष्टी नष्ट होत चालली आहे. या आधीही कित्येकवेळा मासे व जलचर मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पालिका प्रशासन केवळ पाहणी करून केवळ उपपाययोजना, कारवाई करण्याचे आश्वासन देते. मात्र, त्यानंतर कारवाई सोडाच पण एकही अधिकारी अशा भागात फिरकत नाही. अलीकडेच पालिकेवर पवना नदी प्रदूषणाबाबत दाखवलेल्या बेजबाबदारपणामुळे पालिकेवर न्यायालयात खटला दाखल झाला आहे. तरीही प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाला जाग येत नाही.